

नवी दिल्ली : आणीबाणीचा कालखंड हा भारताच्या काळ्या अध्यायांपैकी एक होता, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केला. या काळ्या कालखंडात लोकशाही निर्घृणपणे चिरडली गेली, असा आरोप देखील त्यांनी केला. आणीबाणी हा संविधानावर झालेला थेट हल्ला होता; कारण या काळात नागरी स्वातंत्र्यावर बाधा घालण्यात आली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने घालण्यात आली आणि भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या संस्थांवर प्रहार करण्यात आला, असे ते म्हणाले.
आणीबाणी काळात लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या सर्वांना पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले की, आणीबाणीने असंख्य नागरिकांचे धैर्य जगासमोर आणले; त्यांनी गप्प राहण्यास नकार दिला आणि संविधानातील आदर्शांचे जतन केले. १९७५ मध्ये याच दिवशी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचा संदर्भ देत 'एक्स'वरील एका पोस्टमध्ये ते म्हणाले, "आणीबाणी हा आमच्या संविधानावर झालेला थेट हल्ला होता. यात नागरी स्वातंत्र्यावर बाधा आली, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने आली, राजकीय नेते, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आणि आमच्या लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या संस्थांवर प्रहार झाला."
पंतप्रधान म्हणाले की, लोकांसाठी संविधान हे १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा, हक्क आणि कर्तव्यांचे प्रतीक आहे. दरम्यान, २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ या काळात, संविधानाच्या कलम ३५२ अन्वये भारतात आणीबाणी लागू करण्यात आली होती. नरेंद्र मोदी सरकार आता हा दिवस 'संविधान हत्या दिवस' म्हणून पाळत आहे.