

नवी दिल्ली/कोलकाता; वृत्तसंस्था : तृणमूल काँग्रेसने मदरशांसाठी 6000 कोटी रुपये खर्च केले; पण राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी काहीच केले नाही. हा पैसा केवळ त्यांच्या खास मतदारसंघासाठी वापरला गेला,” अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली. पश्चिम बंगाल दौर्याच्या दुसर्या दिवशी मोदी यांनी सिलीगुडी येथे जाहीर सभा घेतली. त्यांनी दार्जिलिंगमधील 5 आणि जलपाईगुडी जिल्ह्यातील 7 मतदारसंघांतील भाजप उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. उत्तर बंगालमध्ये भाजप आपली पकड मजबूत करण्यावर भर देत असल्याचे या सभेतून स्पष्ट झाले.
सभेत मोदी यांनी सीएएचा उल्लेख करत “कमळ फुलवा, घुसखोर हटवा” अशी घोषणा दिली. मोदी म्हणाले, तृणमूल सरकार कठोर आणि पक्षपाती आहे; मात्र आम्ही सीएएच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचा अधिकार सुरक्षित केला आहे. गेल्या 15 वर्षांत बंगालमध्ये काय झाले, याचा हिशोब आता जनतेसमोर द्यावा लागेल. तृणमूलचा बंगालमध्ये पराभव निश्चित आहे. सिलीगुडीतील ही सभा त्यांच्या झोपेचे खोबरे करेल. दार्जिलिंग आणि उत्तर बंगाल हा चहा उत्पादनासाठी प्रसिद्ध भाग आहे.
पण तृणमूल सरकारने चहाबागांकडे दुर्लक्ष केले. तुमच्या चहाचा स्वाद मला चांगला ठाऊक आहे; पण राज्य सरकार या उद्योगालाच नष्ट करत आहे. आसाममध्ये चहाबाग कामगारांच्या शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी काम झाले आहे. बंगालमध्येही अशा कुटुंबांना जमीन पट्टे देण्यात येतील.
मोदी यांनी आरोप केला की, उत्तर बंगालमध्ये तृणमूलची राजकारणाची पद्धत भीती निर्माण करण्यावर आधारित आहे. “लोकांना घाबरवणे, दुर्लक्ष करणे आणि राजकीय हिंसाचार करणे ही येथे सामान्य बाब झाली आहे. काही ठिकाणी नेत्यांच्या हत्या घडवल्या जातात,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.