Exam Reform Task Force: परीक्षा व्यवस्थेतील बदलासाठी PM मोदींची मोठी घोषणा! नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्स स्थापन

VIDEO : पंतप्रधानांचे नवे ‘इन्स्टा रील’ व्हायरल, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी केंद्राचा मास्टरप्लॅन
Exam Reform Task Force: परीक्षा व्यवस्थेतील बदलासाठी PM मोदींची मोठी घोषणा! नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्स स्थापन
Published on
Updated on

नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकारने परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इन्स्टाग्रामद्वारे देशाला संबोधित करत परीक्षा व्यवस्था अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी जागतिक कीर्तीचे तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय (हाय-पॉवर) टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कुठल्याही प्रकारे तडजोड केली जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू असून अनेक आरोपी सध्या तुरुंगात आहेत. तसेच अशा गुन्ह्यांचा जलदगतीने निकाल लावण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांची व्यवस्था करण्यात आली असून, संसदेत कठोर तरतुदींसह नवीन कायदा आणण्याच्या दिशेनेही सरकार पुढे जात आहे.

ते पुढे म्हणाले की, केवळ दोषींवर कारवाई करून चालणार नाही, तर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेत मूलभूत बदल करणे आवश्यक आहे. भारतातील परीक्षा पद्धती अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणे गरजेचे आहे. याच उद्देशाने नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही समिती परीक्षा सुधारणांबाबत सविस्तर अहवाल सादर करेल आणि त्यानुसार आगामी परीक्षा अधिक सुरक्षित व विश्वासार्ह करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविल्या जातील.

या उच्चस्तरीय समितीत विविध क्षेत्रांतील अनुभवी तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. परीक्षा घेण्याची पद्धत, तांत्रिक सुरक्षा, लॉजिस्टिक्स, प्रशासकीय यंत्रणा आणि संपूर्ण परीक्षा प्रक्रियेत आवश्यक सुधारणा याबाबत ही समिती सरकारला शिफारसी आणि मार्गदर्शन करणार आहे.

या टास्क फोर्समध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज नंदन नीलेकणी यांच्यासह इस्रोचे माजी अध्यक्ष एस. सोमनाथ, गुप्तचर विभागाचे (IB) माजी संचालक तपन डेका, आयआयटी मद्रासचे संचालक डॉ. व्ही. कामकोटी, माजी शिक्षण सचिव अनिता करवाल आणि लॉजिस्टिक्स व व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ अमृत लाल मीणा यांचा समावेश आहे.

कोण आहेत नंदन नीलेकणी?

नंदन मोहनराव नीलेकणी हे भारतातील आघाडीचे तंत्रज्ञान उद्योजक आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासातील महत्त्वाचे नाव मानले जाते. इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि आधार (Aadhaar) प्रकल्पाचे प्रमुख शिल्पकार म्हणून त्यांची देशभरात ओळख आहे. त्यांचा जन्म २ जून १९५५ रोजी बेंगळुरू येथे झाला. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली.

१९८१ मध्ये एन. आर. नारायण मूर्ती आणि इतर सहकाऱ्यांसह त्यांनी इन्फोसिसच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे ही कंपनी भारतातील अग्रगण्य माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक ठरली. २००२ ते २००७ या काळात त्यांनी इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणून काम पाहिले. २०१७ मध्ये ते कंपनीचे अध्यक्ष (Chairman) म्हणून पुन्हा रुजू झाले.

२००९ मध्ये तत्कालीन यूपीए सरकारने त्यांची भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या नेतृत्वाखाली आधार प्रकल्पाची अंमलबजावणी झाली आणि देशातील नागरिकांना १२ अंकी अद्वितीय ओळख क्रमांक देण्याची ऐतिहासिक योजना साकार झाली. आज आधार ही जगातील सर्वात मोठ्या डिजिटल ओळख प्रणालींपैकी एक मानली जाते.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना बेंगळुरू दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपचे अनंत कुमार यांच्याकडून त्यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला. त्यानंतर त्यांनी सक्रिय निवडणूक राजकारणापासून दूर राहणे पसंत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news