नवी दिल्ली : बदलापूर एन्काऊंटरप्रकरणी मुंबईतील घनश्याम उपाध्याय या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी केली आहे. प्रकरणाचा तपास एसआयटीकडून पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलिस अधिकार्यांना निलंबित करण्याची मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे.
एसआयटीत केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) मधील अधिकार्यांचा समावेश असावा, कर्तव्य बजावताना बॉडी कॅमेर्याच्या वापरातून पोलिस अधिकार्यांवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश केंद्र सरकार तसेच राज्य सरकारांना द्यावेत, अशी मागणीही याचिकेत केली आहे. तपास पूर्णपणे सीबीआयकडे देण्यास उपाध्याय यांनी विरोध केला आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने काही प्रकरणांमध्ये सीबीआयला ‘पिंजर्यात बंदिस्त पोपट’ म्हटले होते, हे त्यामागचे कारण असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.