

Narendra Modi on Pahalgam Attack
मधुबनी (बिहार) : पहलगाम येथे पर्यटकांवर गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांची ओळख पटवू, त्यांना शोधून काढू आणि त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा त्यांना देऊ, असा वज्रनिर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवला.
बिहारमधील मधुबनी येथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त गुरूवारी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
पहलगाम येथील बैसरण येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सार्वजनिकरित्या या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. या हल्ल्यात किमान 26 जणांचा मृत्यू झाला होता.
मोदी म्हणाले, "देशाच्या शत्रुंनी केवळ केवळ निष्पाप पर्यटकांवर नव्हे, तर भारताच्या आत्म्यावरच हल्ला करण्याचे धाडस केले आहे. दहशतवाद्यांच्या हाती उरलेली थोडीफार जमीनसुद्धा आता हिरावून घेण्याची वेळ आली आहे
आज बिहारच्या भूमीवरून मी संपूर्ण जगाला सांगतो की भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांची ओळख पटवेल, त्यांना शोधून काढेल आणि शिक्षा देईल.
आपण त्यांचा पृथ्वीच्या टोकापर्यंत पाठलाग करू.आपण त्यांचा शेवटपर्यंत पाठलाग करू. दहशतवादामुळे भारतीयत्वाचे स्पिरीट कधीही कमी होणार नाही. दहशतवादाला माफ केले जाणार नाही.
दहशतवाद्यांना शिक्षा न देता कदापि सोडले जाणार नाही. दहशतवादाचा बळी ठरलेल्यांना न्याय मिळावा यासाठी हर एक प्रयत्न केला जाईल. संपूर्ण देश या निर्धारात एकदिलाने उभा आहे.
जे कोणी मानवतेवर विश्वास ठेवतात ते सर्व आपल्यासोबत आहेत. या कठीण काळात आमच्यासोबत उभे राहिलेल्या विविध देशांच्या नागरिकांचे आणि नेत्यांचे मी आभार मानतो
मानवतेवर विश्वास ठेवणारे सर्व लोक आपल्यासोबत आहेत. या कठिण प्रसंगी आमच्यासोबत उभे राहिलेल्या विविध देशांच्या लोकांचे आणि नेत्यांचे मी आभार मानतो.
मोदी यांनी ठामपणे सांगितले की हल्ला करणारे दहशतवादी आणि याचा कट रचणारे त्यांच्या कल्पनेपलीकडे जाऊन शिक्षा भोगतील. देशाच्या शत्रूंनी भारतीयत्वाच्या स्पिरिटवर हल्ला करण्याचे धाडस केले आहे.
तत्पूर्वी, पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि उपस्थित जमावाने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृत्यूंच्या सन्मानार्थ काही क्षण मौन पाळले.
भाषण सुरू करण्यापूर्वी मोदी यांनी उपस्थित जनतेला आवाहन केले की, "आपल्या कुटुंबातील सदस्यांचे" स्मरण करून मौन पाळावे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना पंतप्रधानांना सांगितले की संपूर्ण देश दहशतवादाच्या विरोधात एकत्र उभा आहे.
पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह म्हणाले, संपूर्ण देश मोदी यांच्या ताकदीवर विश्वास ठेवतो आणि खात्री आहे की ते योग्य वेळी दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देतील.