

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनात मंगळवारी झालेल्या शानदार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना (1 पद्मभूषण आणि 5 पद्मश्री) त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. यंदाच्या पद्म पुरस्कार वितरणाची प्रक्रिया दोन टप्प्यात झाली. पहिल्या टप्प्यात 71 जणांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले तर दुसर्या टप्प्यात 68 पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.
द्वितीय टप्प्यात मंगळवारी पार पडलेल्या पद्म पुरस्कार समारंभात महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. माजी लोकसभा अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर ‘पद्मभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मनोहर जोशी यांचे सुपुत्र उन्मेश जोशी यांनी पुरस्कार स्वीकारला. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अतरौली घराण्याच्या ख्याल गायकी परंपरेतील आघाडीच्या गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, देवनागरी लिपीच्या कलेला नवसंजीवनी देणारे प्रसिद्ध कॅलिग्राफर अच्युत पालव, होमिओपॅथीच्या माध्यमातून त्यांनी गरजूंच्या आरोग्यसेवेत अतुलनीय योगदान देणारे डॉ. विलास डांगरे, यवतमाळ जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी सुभाष शर्मा यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.