पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावर पंतप्रधान मोदी यांनी संबोधन केले. यावेळी पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान सभागृहात विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे पंतप्रधानांना आपले भाषण काही काळ थांबवावे लागले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत भाषणाला उभे राहताच विरोधकांनी संसद सभागृहात प्रचंड गदारोळ घातला. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना आपले वर्तन सभागृहातील संसदीय परंपरेनुसार नाही, असे खडसावून शांत राहण्याचे आवाहन केले. तरीही विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. विरोधकांच्या प्रचंड गदारोळत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे भाषण सुरूच ठेवले.
यावेळी नीट परीक्षेबाबत चर्चा करण्याची विरोधकांची जोरदार मागणी केली. न्याय दो न्याय दो, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. परंतु, मोदींनी आपले भाषण सुरूच ठेवले.ते म्हणाले की, लोकसभेची निवडणूक देशातील मोठी निवडणूक ठरली. तिसऱ्यांदा देशाची सेवा करण्याची संधी जनतेने आम्हाला दिली आहे. जनतेने आमच्या १० वर्षांच्या कामाचा रेकॉर्ड बघितला आहे. देशसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
''भ्रष्टाचाराविरोधातील झिरो टॉलरन्स धोरणासाठी देशाने आम्हाला आशीर्वाद दिला. आज जगभरात भारताची विश्वासार्हता वाढली आहे. आमच्या प्रत्येक धोरणाचे, प्रत्येक निर्णयाचे, प्रत्येक कृतीचे एकमेव उद्दिष्ट प्रथम भारत आहे." असे पीएम मोदी म्हणाले.
पीएम मोदी पुढे म्हणाले की, "जगातील सर्वात मोठ्या निवडणूक प्रक्रियेत जनतेने आम्हाला निवडून दिले आहे आणि मी काही लोकांच्या वेदना समजू शकतो. ते सतत खोटेपणा पसरवत असतानाही त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले."