

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत ८२७ भारतीय नागरिक इराणमधून मायदेशी परतले असल्याची माहिती शनिवारी परराष्ट्र मंत्रालयाने दिली. इराणमधील उर्वरित भारतीयांना देखील मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. इराण आणि इस्रायलमधील संघर्ष तीव्र झाल्यामुळे दोन्ही देशांमधून भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन सिंधू सुरु केले आहे.
ऑपरेशन सिंधू अंतर्गत पहिल्या टप्प्यात इराणमधून ११० भारतीय विद्यार्थी सुरक्षितपणे मायदेशी परतले. या विद्यार्थ्यांना विशेष विमानाने मायदेशी परत आणण्यात आले. त्यानंतर २० जून रोजी २९० भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले गेले, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सांगितले. २१ जून रोजी पहाटे ११७ भारतीयांना घेऊन विशेष विमान आल्याचे ते म्हणाले. तर २१ जून रोजी दुपारी ४.३० वाजता इराणमधून ३१० भारतीय नागरिकांना घेऊन नवी दिल्लीत एक विमान दाखल झाले. यासह आतापर्यंत एकूण ८२७ भारतीयांना मायदेशी आणण्यात आल्याचे ते म्हणाले.