

श्रीनगर : वृत्तसंस्था
नॅशनल कॉन्फरन्सशी निवडणूकपूर्व युती असूनही काँग्रेसने मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारमध्ये सहभागास नकार दिल्यानंतर अवामी इत्तेहाद पक्षाचे प्रमुख तसेच खासदार इंजिनिअर अब्दुल राशिद यांनी बुधवारी ओमर अब्दुल्लांच्या सरकारला भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचेच पाठबळ असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली.
कोण आहेत राशिद?
2016 मध्ये : राशिद यांना यूएपीएअंतर्गत टेरर फंडिंगच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.
2024 मध्ये : कारागृहात असताना राशिद बारामुल्लातून ओमर यांचा पराभव करून लोकसभेची निवडणूक जिंकले होते.
भाजपने नॅशनल कॉन्फरन्सला मदत केली आहे, त्यामुळेच हा मृतवत पक्ष खोर्यात परतला आहे. विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण सामना केंद्र सरकारकडून फिक्स होता, असेही राशिद यांनी म्हटले आहे. कलम 370 खोर्यातून हटविण्याबाबतही दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले होते. ओमर यांच्या शपथविधीची स्क्रिप्ट तेव्हापासूनच लिहायला सुरुवात झालेली होती, असेही राशिद म्हणाले. आता ओमर अब्दुल्ला संपूर्ण राज्याच्या दर्जाबद्दल तेवढे बोलत आहेत. कलम 370 आणि 35 अ बद्दल ब्र शब्दाने बोलत नाहीत. पंतप्रधान मोदींनी 370 हटवले, त्याआधी 3 दिवसांपूर्वी त्यांनी फारुख अब्दुल्लांची भेट घेतली.