

डेहराडून : बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती (बीकेटीसी) आगामी चारधाम यात्रा हंगामासाठी भाविकांसाठी अत्यंत कडक नियमावली लागू करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये मंदिर परिसरात मोबाईल फोन नेण्यास पूर्णपणे बंदी घालणे आणि बिगरहिंदूंना प्रवेश नाकारणे यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रस्तावांचा समावेश आहे.
मंदिराचे पावित्र्य राखणे आणि अलीकडच्या काळात मंदिर परिसरात व्हिडीओग्राफी, रिल्स आणि ब्लॉगिंगचे वाढते पेव रोखणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. हे प्रस्तावित नियम लवकरच होणार्या समितीच्या बैठकीत अंतिम केले जाण्याची शक्यता असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी दिली.
समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिर परिसरात मोबाईल वापरण्यावर पूर्ण बंदी घालण्याचा विचार गांभीर्याने सुरू आहे. जर कोणी प्रतिबंधित क्षेत्रात मोबाईल वापरताना आढळले, तर त्यांचा मोबाईल जप्त केला जाईल आणि त्यांच्यावर मोठा दंडही आकारला जाईल.
यापुढे मंदिर परिसरात ब्लॉगिंग किंवा फिल्मिंग करायचे असल्यास बीकेटीसी किंवा जिल्हा प्रशासनाची लेखी पूर्वपरवानगी आवश्यक असेल. अनधिकृतपणे शूटिंग करणार्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, ज्यामुळे गर्दीचे नियोजन करणेही सोपे होईल.