

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये (ईव्हीएम) छेडछाड झाली नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती गुरुवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या दहा उमेदवारांनी ईव्हीएम तपासणी आणि पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केले होते. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी ईव्हीएम, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटची तपासणी आणि पडताळणी केली. यामध्ये मतदान यंत्रांमध्ये कोणताही दोष आढळला नसल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.
१० विधानसभा मतदारसंघांमध्ये ही प्रक्रिया राबवण्यात आली. या सर्व प्रकरणांमध्ये, व्हीव्हीपॅट स्लिपच्या संख्येत कोणताही फरक किंवा तफावत आढळली नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले. या प्रक्रियेमुळे पुन्हा एकदा सिद्ध होते की, ईव्हीएम छेडछाड अशक्य आहेत, असे आयोगाने म्हटले. १० मतदारसंघांमध्ये मतदानादरम्यान वापरल्या गेलेल्या ४८ बॅलेट युनिट्स, ३१ कंट्रोल युनिट्स आणि ३१ व्हीव्हीपॅटची तपासणी आणि पडताळणी करण्यात आली. या प्रक्रियेत ८ उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी पहिली. तर दोन उमेदवारांनी उपस्थित राहणे टाळले असल्याचे समजते.
कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, खडकवासला, माजलगाव या मतदारसंघात मायक्रोकंट्रोलर आणि मेमरी पडताळणीसाठी निदान चाचणी घेण्यात आली. तर पनवेल, अलीबाग, आर्णी, येवला, चंदगड, कोल्हापूर उत्तर आणि माजलगाव येथील यंत्रांवर निदान चाचणीबरोबरच मॉक पोल घेण्यात आला. सर्व चाचण्यांमध्ये यंत्रे योग्य कार्यरत असल्याचे प्रमाणित झाले असल्याचे आयोगाने सांगितले.
१. कोपरी-पाचपाखडी
२. ठाणे
३. पनवेल
४. अलिबाग
५. खडकवासला
६. आर्णी
७. येवला
८. चंदगड
९. कोल्हापूर उत्तर
१०. माजलगाव