

nitish kumar rajya sabha
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आता राज्याच्या राजकारणातून एक्झिट घेऊन केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार आज राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, त्यांच्या या निर्णयामुळे बिहारमध्ये मोठ्या राजकीय फेरबदलांचे संकेत मिळत आहेत. नितीश कुमार आज राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतील, तेव्हा त्यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. भाजप आणि जेडीयू मधील हे सलोख्याचे संबंध आणि नितीश कुमारांचे केंद्रात जाणे, हे बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होण्याचे स्पष्ट संकेत मानले जात आहेत.
राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेला एक संदेश दिला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले: "गेल्या दोन दशकांहून अधिक काळ तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात. संसदीय जीवन सुरू करताना माझी एक इच्छा होती की, बिहार विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांचा (लोकसभा आणि राज्यसभा) मी सदस्य असावे. याच क्रमाने मी यावेळी राज्यसभा सदस्य होऊ इच्छितो." त्यांनी पुढे स्पष्ट केले की, हा निर्णय त्यांचा स्वतःचा असून विकसित बिहार बनवण्याचा त्यांचा संकल्प कायम राहील. नवीन सरकारला त्यांचे पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन असेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.
आपल्या राजकीय प्रवासाचे स्मरण करताना नितीश कुमारांनी म्हटलं आहे की, सर्व विधिमंडळ सभागृहांमध्ये सेवा करण्याची त्यांची जुनी इच्छा होती. माझ्या संसदीय प्रवासाच्या सुरुवातीपासूनच, बिहार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य होण्याची माझी इच्छा होती. त्याच इच्छेनुसार, यावेळी होत असलेल्या निवडणुकीत मी राज्यसभेचा सदस्य होऊ इच्छितो,” असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.
“मी तुम्हाला पूर्ण प्रामाणिकपणे खात्री देऊ इच्छितो की, तुमच्याशी असलेले माझे नाते भविष्यातही कायम राहील. आणि तुमच्या सोबतीने विकसित बिहार घडवण्याचा माझा संकल्प अढळ राहील. राज्यात स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला त्यांचे “पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन” असेल. दरम्यान, जेडीयू (JD-U) च्या सूत्रांनुसार, १६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपर्यंत तरी नितीश कुमार मुख्यमंत्रीपदावर कायम राहण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये केवळ मुख्यमंत्रीच बदलणार नाही, तर नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांना बिहारचे उपमुख्यमंत्री पद दिले जाण्याची शक्यता आहे.