

नवी दिल्ली : राज्यातील पडीक जमिनीवर बांबूची लागवड करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने योजना बनवावी. यासाठी कॅबिनेटमध्ये चर्चा केली जावी. यामुळे राज्यातील कोट्यावधी युवकांना रोजगार मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केले. दिल्लीत जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आयोजित परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे अर्थ व कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल, फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष पाशा पटेल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमातील उपस्थितांना संबोधित करताना नितीन गडकरी म्हणाले की, पडीक जमिनीवर बांबूची लागवड केल्याने रोजगाराबरोबर पर्यावरणाचे रक्षण होईल. विविध ठिकाणी दगडी कोळस्याऐवजी बांबूचा वापर केला जाऊ शकतो. महाराष्ट्रासह भारतातील औष्णिक विद्युत केंद्र कोळस्याऐवजी बांबूचा वापर करतील. बांबूची गरज मोठ्या प्रमाणावर असल्याचे ते म्हणाले. यामुळे प्रदूषण रोखण्यास देखील मदत होईल, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी गाव, गरीब आणि शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीवर भाष्य करत चिंता व्यक्त केली. शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा कमी भावात बाजारात शेतीमाल विकावा लागतो, असे ते म्हणाले. याबरोबर शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर डिझेलवर नाही तर वीज, सीएनजी आणि इथेनॉलवर चालणार असल्याचे ते म्हणाले. तसेच शौचालयाच्या पाण्यापासून डीएपी खत बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले. बेल्जियममधील काही लोकांनी यासंबंधातील सादरीकरण दिले असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमानंतर बोलताना पाशा पटेल म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांबू लागवडीच्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. बांबूपासून शेकडो वस्तू बनवता येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी आशिष जैस्वाल यांना उद्देशून म्हणाले वनमंत्री तुम्ही आहात ना? यावर आशिष जैस्वाल यांनी होणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले. यामुळे राज्याचे वनमंत्रीपद भाजपचे गणेश नाईक यांच्याकडून शिवसेना शिंदे गटाचे आशिष जैस्वाल यांच्याकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले.