

नवी दिल्ली : येत्या सहा महिन्यांमध्ये इलेक्ट्रीक, पेट्रोल आणि डिझेल वाहनांची किंमत सारखी असेल, अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी दिली. तसेच देशातील सर्व वाहन उत्पादक कंपन्या १०० टक्के इथॅनॉलवर चालणाऱ्या गाड्या बाजारात आणत आहेत. या गाड्यांद्वारे कुठलेही प्रदूषण होत नाही तसेच या गाड्या ६० टक्के ऊर्जा निर्माण करतील, आता अनेक लोकांना इलेक्ट्रीक गाडी मिळण्यासाठी वाट बघावी लागते, असेही गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी म्हणाले की, लिथियम आयन बॅटरी आणल्यानंतर बॅटरीची किंमत कमी झाली आहे. आधी ही किंमत १५० डॉलर प्रति किलो वॅट प्रति तास होती,आता ती किंमत १०५ प्रति किलो वॅट प्रति तास होईल. यानंतर डिझेल- पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या आणि इलेक्ट्रिक गाड्या या सगळ्यांची किंमत ही सारखीच असणार आहे. इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही. येणाऱ्या काळामध्ये पुर्णपणे इलेक्ट्रिक वाहने चालतील. सबंध देशात इलेक्ट्रीक वाहनांचा खप चांगला होत आहे. अनेक लोकांना इलेक्ट्रिक गाडी मिळवण्यासाठी वाट बघावी लागत आहे. पुढच्या ५ वर्षांमध्ये दिल्लीमध्ये सगळ्या बसेस इलेक्ट्रिक असतील. आता इलेक्ट्रिक ट्रक देखील आहेत येत आहेत. दरम्यान, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ५०० इलेक्ट्रिक गाड्या घेतल्याचे सांगितले आहे. देशात येणाऱ्या काळात १ लाख इलेक्ट्रिक बसेस बनतील, असेही ते म्हणाले.
देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बेसिक कस्टम ड्युटीमधून सूट देण्यात आलेल्या साहित्यांच्या यादीत ३५ भांडवली वस्तूंचा समावेश करण्याची घोषणा केली. यामागचा उद्देश भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीच्या उत्पादनाचा खर्च कमी करणे आहे. या माध्यमातून विशेषतः लिथियम-आयन बॅटरीमधील स्क्रॅप, कोबाल्ट पावडर, टाकाऊ कोबाल्ट, शिसे, जस्त यासारख्या महत्त्वाच्या कच्च्या मालासाठी सूट प्रदान केली जाईल.
नितीन गडकरी म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालय एकसमान टोल धोरणावर काम करत आहे. आता भारतातील महामार्ग पायाभूत सुविधा अमेरिकेच्या बरोबरीची आहे. दरम्यान, एकसमान टोल धोरणामुळे प्रवाशांना येणाऱ्या समस्या सोडवल्या जातील." असेही ते म्हणाले. परिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवर एक बाधारहित ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (जीएनएसएस) आधारित टोल संकलन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय प्रवाशांच्या सोशल मीडियावरील तक्रारी अतिशय गांभीर्याने घेत आहे आणि संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करत आहे, असेही गडकरी म्हणाले.
"येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा आहे आणि केवळ इलेक्ट्रिक गाड्या नव्हे तर ट्रक देखील इलेक्ट्रिक असतील. तसेच आजही रस्त्यावर अनेक इलेक्ट्रिक बसेस धावत आहेत"
नितीन गडकरी, केंद्रीय परिवहन मंत्री