

यमुना द्रुतगती महामार्गावर दाट धुक्याने केला प्रवाशांचा घात; विचित्र अपघाताने खळबळ.
अपघातात किमान 7 बस व 3 मोटारींसह 10 हून अधिक वाहने एकमेकांवर आदळली.
अपघातानंतर वाहनांना आग लागल्यामुळे
सर्व 13 प्रवाशांचा होरपळून कोळसा.
अपघातामुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आली.
मथुरा : उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात यमुना द्रुतगती मार्गावर मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने 7 बस गाड्या आणि 3 कार एकमेकांवर जोरात धडकल्या. या भीषण अपघातात अनेक गाड्यांना आग लागल्याने 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला. यातील बहुतांश जिवंत जळाल्याने त्यांचा जागीच कोळसा झाला. अपघातात शंभरावर प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची तीव्रता एवढी होती की, तुकडे झालेल्या जळालेल्या मृतदेहांचे अवशेष 17 पिशव्यांमध्ये भरावे लागले. या भीषण दुर्घटनेमुळे सर्वांच्याच अंगाचा थरकाप उडाला आहे.
दाट धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी असल्याने सात बसेस आणि तीन कार एकमेकांवर जोराने आदळल्या. ही धडक इतकी भीषण होती की, यातील वाहनांनी पेट घेतली. आग आणि धुराने लपेटल्यामुळे बसमधील प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र आग झपाट्याने वाढत गेली आणि त्यात 13 जणांचा अक्षरशः कोळसा झाला. याची भीषणता इतकी होती की, मृतदेहांचे अवशेष 17 पॉलिथिन बॅगमध्ये भरून न्यावे लागले. केवळ दोन मृतांची ओळख पटली आहे.
अपघात आग्रा-नोएडा पट्ट्यावर पहाटे साडेचारच्या सुमारास झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात किमान सात बस आणि तीन कारचा समावेश होता. या अपघातामुळे वाहनांना आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी 11 अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या.
बचावकार्य आणि तपास
जिल्हाधिकारी चंद्र प्रकाश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बलदेव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील 127 व्या मैलाच्या दगडाजवळ ही घटना घडली. जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बचाव कार्यावर लक्ष ठेवले. पोलिस, अग्निशमन सेवा, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य आपत्कालीन प्रतिसाद दल यांच्या पथकांनी एकत्रितपणे बचाव कार्य केले. अपघातामुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक तत्काळ थांबवून इतर मार्गावर वळवण्यात आली होती. जखमी आणि अडकलेल्या प्रवाशांना नंतर शासकीय वाहनांनी त्यांच्या गंतव्यस्थानी पाठवण्यात आले.
मृत आणि नुकसान
बलदेव पोलिस ठाण्याच्या निरीक्षक रंजना सचन यांनी सांगितले की, मृत्यू झालेल्यांमध्ये 44 वर्षीय अखिलेंद्र प्रताप यादव (रा. प्रयागराज) आणि 75 वर्षीय रामपाल (रा. महाराजगंज जिल्हा) यांचा समावेश आहे. सर्व 13 प्रवाशांचा मृत्यू आगीमुळे भाजल्यामुळे झाला आहे.अपघातानंतर मोठा स्फोटांचा आवाज आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. एका प्रवाशाने सांगितले की, आग्रा ओलांडल्यानंतर त्यांची बस अचानक थांबली आणि नंतर प्रवाशांनी दरवाजे तोडून महिला आणि लहान मुलांना बाहेर काढले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केले
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आणि मृतांच्या कुटुंबीयांना सहानुभूती दिली. त्यांनी एक्सवर हिंदीत पोस्ट करून लिहिले, मथुरा जिल्ह्यातील यमुना द्रुतगती मार्गावर झालेल्या रस्ते अपघातात झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. शोकाकुल कुटुंबियांप्रति माझ्या सखोल संवेदना आहेत. मुख्यमंत्र्यांनी जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या कार्यालयाच्या पोस्टनुसार, मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.