

Mahua Moitra and Mamata Banerjee : राजकारण हे सत्तेसाठी असतं आणि राजकीय वर्तुळ हे सत्तेभोवती फिरते. सत्ता नवे मित्र मिळवते आणि जुन्या मित्रांना भूतकाळातील मैत्रीचे स्मरणही करून देते. सत्ता असेल तर शत्रूही मित्र होतात, असाच काहीसा सत्तेचा 'म्युझिकल चेअर'चा खेळ सध्या महाराष्ट्रासह पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चिला जातोय. राजकारणातील हा 'सोयीचा बदल' महाराष्ट्रात उद्धव ठाकरे तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी अनुभवत आहेत. कालपर्यंत ममता बॅनर्जी यांची भक्कम पाठराखण करणाऱ्या महुआ मोइत्रा यांनी चक्क पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. जुन्या मैत्रीचे स्मरण करत त्यांनी केलेल्या या कौतुकाने राजकीय वर्तुळात आता महुआ मोइत्राही ममतांची साथ सोडणार का, अशी चर्चा रंगली आहे.
अलीकडच्या काळात तृणमूल काँग्रेसमध्ये बंडखोरांची मालिकाच सुरू झाली आहे. नुकतेच ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदार आणि इतर नेत्यांनी ममता बॅनर्जी यांना त्यांनीच स्थापन केलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवले. या सगळ्यात त्यांच्या अत्यंत जवळच्या खासदार आणि टीएमसीच्या फायरब्रँड नेत्या महुआ मोइत्रा यांनीही एक धक्कादायक वक्तव्य केले आहे.
महुआ मोइत्रा आणि शुभेंदु अधिकारी हे सध्याच्या काळात एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. मात्र, मोइत्रा यांच्या या वक्तव्यामुळे ममता बॅनर्जी यांची चिंता वाढू शकते. महुआ मोइत्रा यांनी २२ जून रोजी 'बीबीसी'ला दिलेल्या एका मुलाखतीत पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांचे कौतुक केले आहे. त्यांनी शुभेंदु यांना एक चांगला मित्र म्हटले असून, त्यांनी मदत केलेल्या जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला.
महुआ मोइत्रा म्हणाल्या, "शुभेंदु माझे खूप चांगले मित्र आहेत. जेव्हा आम्ही एकाच पक्षात होतो, तेव्हा त्यांनी मला खूप साथ दिली. जेव्हा मी करीमपूरमधून निवडणूक लढवली, तेव्हा केवळ तेच माझ्या प्रचारासाठी आले होते. मला जी काही मदत लागायची, ती ते पाठवून द्यायचे. २०१४ मध्ये जेव्हा मला लोकसभेचे तिकीट मिळणार होते, पण ते ऐनवेळी मिळाले नाही, तेव्हा मी रात्रभर रडत होते. त्या कठीण काळात फक्त शुभेंदु अधिकाऱ्यांनीच मला साथ दिली होती. त्यांनी मला सांगितले होते- 'नाही बहीण, मी आहे ना!' हे सगळे भावनिक ऋणानुबंध कायम राहतात. आज आम्ही दोघे वेगवेगळ्या पक्षात आहोत, आमचे बोलणे होत नाही, ही वेगळी गोष्ट आहे." विशेष म्हणजे, त्या काळात शुभेंदु अधिकारी तृणमूल काँग्रेसमध्ये होते आणि ममता बॅनर्जी यांच्यानंतर पक्षातील सर्वात वजनदार नेत्यांमध्ये त्यांची गणना होत असे. डिसेंबर २०२० मध्ये शुभेंदु अधिकारी यांनी टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. महुआ मोइत्रा सध्या त्यांच्या राजकीय प्रवासातील सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी सांगत होत्या.
महुआ मोइत्रा यांनी २०१६ मध्ये पश्चिम बंगालच्या करीमपूर विधानसभा मतदारसंघातून आपली पहिली निवडणूक लढवली आणि ती जिंकलीही होती. त्यावेळी शुभेंदु अधिकारी टीएमसीचे मोठे संघटक आणि नादिया जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक होते. महुआ याच काळाचा उल्लेख करत आहेत की, जेव्हा संघटनेतील इतर नेत्यांनी त्यांना साथ दिली नाही, तेव्हा शुभेंदु अधिकाऱ्यांनी त्यांच्यासाठी निवडणूक प्रचार केला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महुआ मोइत्रा या कृष्णानगर मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छित होत्या. मात्र, सुरुवातीच्या चर्चेत तिकीट मिळण्याबाबत संभ्रम निर्माण झाला तेव्हा त्या भावूक झाल्या होत्या. त्या वेळी शुभेंदु यांनी एक वरिष्ठ सहकारी म्हणून त्यांना धीर दिला होता. पुढे महुआ यांना कृष्णानगरमधून तिकीट मिळाले आणि त्या जिंकल्या होत्या.