नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभेचे ठोकळे विधानसभेत चालत नाहीत. त्यामुळे उद्या होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीतही महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा आशावाद महाराष्ट्रातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. दिल्लीत एका बैठकीच्या निमित्ताने ते आले होते. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. Gulabrao Patil
महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील जल जीवन मिशनच्या बैठकी संदर्भात दिल्ली दौऱ्यावर होते. गुलाबराव पाटील म्हणाले की, “आज (दि.११) सकाळी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्यासह बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यात पाणी पुरवठ्याच्या संदर्भात सुरू असलेल्या विविध योजनांचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला. राज्यात कोणत्या योजना कितपत पूर्ण झाल्या आहेत, पूर्णतेची टक्केवारी किती आहे, अंतिम पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागणार आहे, अशा विविध बाबतीमध्ये आढावा या बैठकीत सादर करण्यात आल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. त्यानंतर ”जळगाव जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे.” त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या काही प्रश्नांसदर्भात चर्चा झाल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले.
यावेळी बोलताना गुलाबराव पाटलांनी नाव न घेता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर टीका केली. “काही लोक अंबानींवर बोलताना असे भाषण करतात जणू जन्मोजन्मीचे शत्रू आहेत आणि संध्याकाळी त्यांच्याच घरी जाऊन नाचतात” असे म्हणत अप्रत्यक्ष टोला लगावला.