नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात तूरा उंचावणारी घटना घडली आहे. महाराष्ट्र राज्याला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्कराचे वितरण (दि.10) जुलैला दिल्लीमध्ये करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्विकारणार आहेत. भारताचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे माजी राज्यपाल पी. सथाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील 15 व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्र राज्याला यंदाचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. नाविन्यपूर्ण धोरणे आणि प्रभावी विकासात्मक उपक्रमांद्वारे कृषी आणि ग्रामीण समृद्धीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राच्या उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने 2.1 दशलक्ष हेक्टर क्षेत्राचे देशातील सर्वात मोठे बांबू मिशन, 1.7 दशलक्ष हेक्टर क्षेत्राचे 123 मेगा सिंचन प्रकल्प, पंतप्रधान किसान सन्मान निधी दुप्पट करणारे पहिले राज्य यासह अनेक परिवर्तनात्मक कार्यक्रमांचे नेतृत्व केले आहे. यासोबतच 4.63 लाख शेतकऱ्यांना नॅनो-टेक्नॉलॉजी खतांचे वितरण आणि सर्वसमावेशक कार्यक्रम सुरू करणे, अशा अनेक गोष्टी करण्यात आल्या आहेत. पुरस्कार समितीच्या म्हणण्यानुसार, या उपक्रमांचा लाखो शेतकऱ्यांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. यातून ग्रामीण समृद्धीला चालना मिळाली आहे. यापुर्वी सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार 2023 मध्ये बिहारला, 2022 मध्ये तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश राज्यांना प्रदान करण्यात आला आहे.
राजधानी दिल्लीत 10 जुलैला हा पुरस्कार 15 व्या ॲग्रीकल्चर लीडरशिप कॉन्क्लेव्हमध्ये प्रदान केला जाणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्यासह ब्राझील, अल्जेरिया, नेदरलँडचे राजदूत प्रामुख्याने उपस्थित असणार आहेत.