

Kurnool bus fire tragedy
हैदराबाद : 'दारू पिऊन गाडी चालवणारे दहशतवादी असतात.' असे मत हैदराबादचे पोलीस आयुक्त व्हीसी सज्जनार यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी यासंदर्भात 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आंध्र प्रदेशमधील कुरनूल येथे झालेल्या बस अपघाताचाही उल्लेख केला आहे. निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्यांना कोणतीही सवलत मिळू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
हैदराबादहून बंगळुरूला जाणारी बसला आंध्र प्रदेशमधील कुरनूल येथे झालेल्या अपघातानंतर आग लागली. या भीषण दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू झाला होता. हैदराबादचे पोलीस आयुक्त व्हीसी सज्जनार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, दारू पिऊन गाडी चालवणारे चालक दहशतवादी असतात. त्यांचे कृत्य दहशतवादापेक्षा किंचितही कमी नाही. कुरनूलमध्ये झालेला बस अपघात, वास्तविक पाहता अपघात आहेच नाही. हा एक प्रकारचा नरसंहार होता, जो टाळता आला असता. दारू पिऊन बाईक चालवणारा तो व्यक्ती थोडासा समजदार आणि जबाबदार असता, तर असे काही झाले नसते. खरे पाहता, हा दुर्लक्ष केल्याचा असा एक गुन्हेगारी प्रकार आहे, ज्याने अनेक कुटुंबांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे.
हैदराबादच्या पोलीस आयुक्तांनी दारु पिवून वाहन चालविणार्यांवर कठोर कारवाईची मागणी करत लिहिले आहे की, अशा प्रकारचे लोक आयुष्य, कुटुंब आणि भविष्य सर्वकाही उद्ध्वस्त करतात. हैदराबाद पोलीस दारू पिऊन गाडी चालवण्याच्या विरोधात 'शून्य सहनशीलता' या धोरणावर काम करत आहेत. दारूच्या नशेत गाडी चालवताना कोणीही पकडला गेल्यास, त्याच्यावर कायद्याचा बडगा उगारला जाईल.यात कोणतीही सूट मिळणार नाही. अशा व्यक्तीवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही. दारू पिऊन गाडी चालवण्याला चूक म्हणणे बंद करा. हा एक गुन्हा आहे, जो आयुष्ये उद्ध्वस्त करतो. त्यामुळे यासाठीची शिक्षा देखील कडक असायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी आपल्या एक्स पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुचाकीस्वार शिवशंकरविरोधात बेपर्वा गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेच्या वेळी शिवशंकरसोबत प्रवास करणाऱ्या एरिसामीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, एरिसामीने पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटले आहेकी, त्याने आणि शिवशंकरने मोटारसायकलवरून जाण्यापूर्वी दारू पिली होती. दारूच्या नशेत असताना शिवशंकरने दुचाकीवरून नियंत्रण गमावले. दुचाकी रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि महामार्गावर पडली. शिवशंकरचा जागीच मृत्यू झाला, तर एरिसामी जखमी झाल आहे. दरम्यान, शिवशंकरचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. तो बसला धडक होण्यापूर्वी बेपर्वा गाडी चालवत असल्याचे दिसत आहे.