

नवी दिल्ली : कोल्हापूर सर्किट बेंच स्थापनेला एक वर्ष पूर्ण झालेले आहे. या सर्किट बेंचचे खंडपीठ होणे ही काळ्या दगडावरची रेष आहे, असा निर्धार सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ‘पुढारी’कार डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी बोलताना व्यक्त केला.
प्रसंग होता कोल्हापूर सर्किट बेंचच्या वर्षपूर्तीनिमित्त मुलाखतीचा. दैनिक ‘पुढारी’च्या प्रस्तुत प्रतिनिधीने माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांची गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी मुलाखत घेतली. यावेळी गवई यांनी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची आठवण काढली अन् लगेच त्यांना फोन केला. यावेळी गवई यांनी डॉ. जाधव यांच्या तब्येतीची विचारपूस केली. डॉ. जाधव गवई यांना म्हणाले, आपल्यामुळेच कोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन झालेले आहे. आपल्या पुढाकारामुळे बेंच झाल्यामुळे कोल्हापूरकरांच्या वतीने आपला सत्कार करायचा आहे. त्यावर ‘सर्किट बेंच वर्षपूर्ती समारंभास मी कोल्हापूरला येणार आहे. कोल्हापूरला खंडपीठ होणे ही काळ्या दगडावरची रेष आहे. ते होणारच,’ असा निर्धार गवई यांनी व्यक्त केला.