

नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी बुधवारी (दि. १२) एक महत्त्वाची घोषणा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. जंतर-मंतर येथील आंदोलनाचा दुसरा भाग अतिशय लवकर सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर नागरिकांकडून याबाबत सातत्याने विचारणा केली जात असल्याचे सांगत त्यांनी या आंदोलनाचे संकेत दिले.
माध्यमांशी संवाद साधताना अभिजीत दीपके यांनी सांगितले की, इंस्टाग्रामवर अनेक नागरिक आणि समर्थक 'जंतर-मंतरचा भाग-२ कधी सुरू होणार?' असा प्रश्न विचारत होते. त्या सर्वांना उत्तर देताना त्यांनी हे आंदोलन लवकरच तीव्र स्वरूपात पुन्हा सुरू होणार असल्याचे जाहीर केले.
याचदरम्यान, दिल्लीत आयोजित कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यावरून दीपके यांनी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. दिल्लीत पक्षाच्या बैठकीसाठी हॉल मिळू नये म्हणून भाजपकडून जाणीवपूर्वक दबाव आणला गेल्याचा थेट आरोप त्यांनी केला. अखेरच्या क्षणी अत्यंत मेहनतीनंतर एका हॉलचे बुकिंग निश्चित झाले होते आणि पक्षाकडे त्याची रीतसर पावतीही उपलब्ध होती. मात्र, मंगळवारी सकाळी संबंधित हॉलच्या मालकांना धमकावण्यात आल्याचा दावा दीपके यांनी केला. 'जर येथे सीजेपीची बैठक होऊ दिली, तर उलटे टांगू', अशी धमकी हॉल मालकांना देण्यात आल्याचे सांगत हा सर्व प्रकार भाजपच्या इशाऱ्यावरूनच घडत असल्याचे ते म्हणाले.
सत्ताधाऱ्यांच्या या कृतीवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढताना दीपके म्हणाले की, अशा प्रकारच्या दबावाच्या राजकारणावरून भाजप देशातील तरुणाईला किती घाबरली आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. अशा क्षुल्लक आणि दडपशाहीच्या मार्गांनी आपल्याला रोखता येईल किंवा घाबरवता येईल असा जर भाजपचा समज असेल, तर तो त्यांचा मोठा गैरसमज आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, अभिजीत दीपके यांनी हॉल बुकिंगवरील दबाव आणि धमक्यांबाबत केलेल्या या गंभीर आरोपांवर भारतीय जनता पार्टीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.