

जम्मू : भारतीय रेल्वेच्या इतिहासात गुरुवारी एका नव्या अध्यायाची भर पडली आहे. पहिली 20-कोचची वंदे भारत एक्सप्रेस जम्मू तवी रेल्वे स्थानकावरून थेट श्रीनगरसाठी रवाना झाली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या रेल्वेला हिरवा कंदील दाखवला. या थेट रेल्वे सेवेमुळे काश्मीर खोरे आता राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी अधिक घट्टपणे जोडले गेले आहे. लवकरच दिल्ली ते काश्मीर अशी थेट रेल्वे सेवाही सुरू होणार आहे.
ही रेल्वे सेवा प्रवाशांना वेगवान आणि आधुनिक कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे. जम्मू विमानतळावरून उतरणारा प्रवासी आता थेट वंदे भारतमध्ये बसून शिवालिक टेकड्या, चिनाब आणि अंजी पुलांसारख्या अभियांत्रिकी चमत्कारांमधून प्रवास करू शकेल. हिमालयीन डोंगररांगांमधील बोगद्यांमधून जाणारा हा प्रवास प्रवाशांना थेट दल लेक आणि मुघल गार्डनपर्यंत नेईल. ‘आता हायवेवरील विलंब किंवा रस्ता बंद होण्याची चिंता करण्याची गरज नाही,‘ असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वंदे भारतची वैशिष्ट्ये
ट्रेनची टक्कर टाळण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा
उणे तापमानातही रेल्वे विनाअडथळा धावणार
थंडीमुळे पाण्याच्या पाइपलाइनमधील पाणी गोठणार नाही.
धुक्यात किंवा बर्फवृष्टीत ड्रायव्हरला स्पष्ट दिसण्यासाठी काचेवर हीटिंगची सोय
प्रवाशांना निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी फिरत्या खुर्च्या