

jammu kashmir bus accident
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात आज (दि. २०) सकाळी भीषण बस अपघात झाला. रामनगरहून येणारी बस कगोत जवळ रस्त्यावरून सुमारे १०० फूट खाली कोसळून उलटली. या अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला असून २९ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
जखमी प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते आणि तिचा वेगही खूप जास्त होता. कगोत नाल्याजवळ अचानक बसचे टायर फुटले. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत कोसळली. या भीषण अपघातात बसच्या वरच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली की, अपघातग्रस्त बस सार्वजनिक वाहतुकीची होती. सध्या जखमींवर उधमपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) उपचार सुरू आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथे बस अपघातामुळे झालेल्या जीवितहानीची बातमी ऐकून मला अत्यंत दुःख झाले आहे. ज्यांनी या दुर्घटनेत आपले जवळचे आणि प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये दिली आहे.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 'पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी'तून (PMNRF) २ लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. तसेच, जखमींना ५०,००० रुपयांची मदत दिली जाईल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे.