

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात 12 लोक मारले गेल्यानंतर एका आठवड्याने, परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी दहशतवादाबाबत भारताची ‘शून्य सहनशीलता’ भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. मंगळवारी मॉस्को येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेत बोलताना जयशंकर म्हणाले की, ‘दहशतवादाचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही, त्याला दुर्लक्षित करता येणार नाही किंवा त्याचे व्हाइटवॉश (दोष लपवणे) करता येणार नाही.’
जयशंकर यांनी स्पष्ट केले की, जगाने दहशतवादाच्या सर्व प्रकारांना आणि अभिव्यक्तींना शून्य सहनशीलतादाखवणे अत्यावश्यक आहे. ‘भारताने हे सिद्ध केले आहे की, आपल्या नागरिकांचे दहशतवादापासून संरक्षण करण्याचा हक्क आपल्याला आहे आणि आम्ही तो वापरणार,’ असे ते म्हणाले. एससीओची स्थापना दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकीपणाया तीन समस्यांचा मुकाबला करण्यासाठी झाली आहे, या गोष्टीची त्यांनी आठवण करून दिली.
दहशतवादाच्या मुद्द्याव्यतिरिक्त, जयशंकर यांनी जागतिक आर्थिक अस्थिरता आणि पुरवठा साखळीतील धोक्यांवर देखील चिंता व्यक्त केली. अशा वातावरणात, आर्थिक संबंधांचे धोके कमी करणे आणि त्यात विविधता आणणे आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी सदस्य राष्ट्रांमध्ये व्यापक, न्याय्य आणि पारदर्शक आर्थिक संबंध प्रस्थापित करणे महत्त्वाचे आहे. या संदर्भात, त्यांनी सदस्यांशी मुक्त व्यापार करारावर भारताचे सुरू असलेले प्रयत्न अधोरेखित केले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्तावित केलेल्या ‘सांस्कृतिक संवाद मंच’ चा संदर्भ देऊन त्यांनी सदस्य राष्ट्रांमधील सामायिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांवर भर दिला, ज्यामुळे लोकांमध्ये परस्पर समंजसपणा वाढेल.
दरम्यान, सोमवारी जयशंकर यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांची मॉस्कोत भेट घेतली, तर रशियन सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलई पाट्रुशेव यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या 4-5 डिसेंबरच्या अपेक्षित भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर या भेटी महत्त्वपूर्ण आहेत.