

High Court on IPL ban
चेन्नई : निवडणुकीच्या काळात तामिळनाडूमध्ये होणाऱ्या 'इंडियन प्रीमियर लीग' (IPL) सामन्यांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी (दि. ६) फेटाळून लावली. या याचिकेवर सुनावणी करताना मुख्य न्यायाधीश एस. ए. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती अरुल मुरुगन यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला फटकारत, 'सामन्यांचा आनंद घेण्याचा' सल्ला दिला.
विधानसभा निवडणुकीच्या काळात सामने आयोजित करण्याऐवजी ते निवडणुकांनंतर घ्यावेत किंवा आदर्श आचारसंहितेचे कडक पालन करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. सामन्याच्या ठिकाणी कोणतेही राजकीय प्रतीक किंवा प्रचार साहित्य प्रदर्शित करू नये, असे निर्देश देण्याची विनंतीही याचिकाकर्त्याने केली होती. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास त्यावर कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोग पूर्णपणे सक्षम असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. खंडपीठाने म्हटले की, आतापर्यंत एक आयपीएल सामना कोणताही अडथळा न येता पार पडला आहे. "तुम्ही केवळ शंकेच्या आधारे ही याचिका दाखल केली आहे. आतापर्यंत एक सामना झाला, त्यात काहीही अनुचित घडले नाही. तुम्ही सामना पाहिला का? काहीही झाले नाही," असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
या प्रकरणावर सुनावणी सुरू असताना न्यायालयात काही काळ हलके-फुलके वातावरण निर्माण झाले होते. खंडपीठाने याचिकाकर्त्याला उपरोधिकपणे म्हटले, "तुम्ही या सामन्याचा आनंद घेतला आहे, आता पुढील सामन्यांचाही आनंद घ्या." नागरिकांना त्यांच्या कोणत्याही तक्रारीसाठी निवडणूक आयोगाशी संपर्क साधण्याचे स्वातंत्र्य असल्याचे स्पष्ट करत, याचिकाकर्त्याने शेवटी आपली याचिका मागे घेतली.