

नवी दिल्ली : दहशतवादाची पाठराखण करणाऱ्या देशासोबत भूतकाळात केलेल्या सिंधू जल कराराला दिलेली स्थगिती हे आपला देश व शेतकऱ्यांच्या हितासाठीचे निर्णायक पाऊल आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात स्पष्ट केले. ‘२०४७ पर्यंत विकसित राष्ट्र’ या ध्येय निश्चितीच्या पूर्ततेसाठी प्रत्येक घटकाने योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले. सर्वसमावेशक विकासाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, असे आवाहन करीत राष्ट्रपतींनी या भाषणात देशाच्या विकासाचा आढावा घेत भविष्यातील वाटचालीची दिशा स्पष्ट केली.
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय राजवटीपासून मुक्तता नव्हे, तर प्रत्येक भारतीयाला स्वप्नांच्या पूर्ततेची संधी मिळणे आणि देशाला सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनविण्यासाठी योगदान देणे होय. देशातील प्रत्येक घटकाचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान महत्त्वपूर्ण आहे.
युवाशक्ती सर्वात मोठी संपत्ती
देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ६५ टक्के नागरिक ३५ वर्षांखालील आहेत. ही युवा शक्ती भारताची सर्वात मौल्यवान संपत्ती असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले. तरुणांच्या प्रतिभा, कौशल्य व नवोन्मेषामुळे देशात स्टार्टअपची परिसंस्था विकसित होत असून, भारतीय युवक जागतिक पातळीवर नेतृत्व करीत आहेत, असे त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी परीक्षा व्यवस्थेत सुधारणांचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ग्लास्गो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांचाही विशेष उल्लेख केला.