

नवी दिल्ली : इंदू मिल स्मारकात उभारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम ४५ ते ५० टक्के काम पुर्ण झाले आहे. २०२७ अखेरपर्यंत सदर पुतळ्याचे काम पुर्ण होईल, अशी अपेक्षा विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली. अण्णा बनसोडे २ दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रख्यात शिल्पकार स्व. राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील कारखान्यात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या कामाची पाहणी केली. या पुतळ्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र विविध धातूंचा वाढता खर्च पाहता पुतळ्याचे काम लांबण्याची शक्यता आहे. तसे होऊ नये यासाठी राज्य सरकारला कालबद्ध पद्धतीने काम करावे लागणार आहे तसेच वाढीव निधीची तरतूद करावी लागणार आहे.
दरम्यान, पुतळ्याच्या कामाची पाहणी केल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. अण्णा बनसोडे म्हणाले की, २०१८ साली या पुतळ्याच्या उभारणीचे कंत्राट राम सुतार यांच्या कारखान्याला देण्यात आले होते. मात्र, २०२६ पर्यंत या प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्याने शासनाने किंमतीतील तफावत तातडीने कंत्राटदाराला देण्याची गरज आहे. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सदर प्रकल्पातील आर्थिक तफावत दूर करण्यासोबतच एमएमआरडीएकडून कंत्राटदारांना वेळेत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक हे भविष्यात एक मोठे पर्यटन आणि प्रेरणास्थळ ठरणार आहे. देश-विदेशातील लाखो अनुयायांसाठी हे केंद्र आकर्षणाचे ठिकाण ठरेल, तसेच बाबासाहेबांच्या विचारांचे जतन करणारे एक महत्त्वपूर्ण स्थळ म्हणूनही ते ओळखले जाईल, असा विश्वासही अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला. दरम्यान, ३५० फूट उंचीच्या या भव्य पुतळ्याचे ४५ ते ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुतळ्याचे बूट आणि पॅंटचा काही भाग तयार झाला असून उर्वरित काम गाझियाबाद येथील कारखान्यात सुरू आहे.
स्मारकाच्या कामाला २०२८ उजाडणार?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे काम प्रगतीपथावर असले तरी अपेक्षित वेळेत पुतळा पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. अण्णा बनसोडे म्हणाले की, या पुतळ्यासाठी विविध धातू वापरले जात आहेत. या धातूंचा पूर्वीचा दर आणि आजचा दर यात मोठी तफावत आहे. ब्राँझचा भाव आधीपेक्षा दुपटीने वाढला आहे. कॉपरचा भाव देखील वाढला आहे. ही तफावत मोठी आहे. ही तफावत भरून काढली तर सदर काम अधिक गतीने करता येईल. यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री आणि सर्व संबंधित घटकांची संयुक्त बैठक घेतल्यानंतर दराच्या तफावतीबद्दल निर्णय करता येईल. मुख्यमंत्री यावर योग्य तोडगा काढतील, असेही बनसोडे म्हणाले.