पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून (दि.१६) बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार होता; पण सततच्या पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करावा लागला आहे. (IND vs NZ Test) आता पावसाने उघडीप दिल्यास उद्या (दि.१७) सकाळी 8:45 वाजता नाणेफेक तर 9:15 वाजता खेळाला सुरुवात होणार आहे.
भारत आणि न्यूझीलंडचे खेळाडू आज सकाळी (दि.१६) बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पोहोचले. काही खेळाडू मैदानात येऊन सराव करतानाही दिसले. मात्र पावसामुळे आजचा दिवसभराचा खेळ रद्द करावा लागला. आज एकही चेंडू टाकता आला नाही. टॉसही होऊ शकली नाही. आज दिवसभर पावसाची शक्यता होती. मध्येच काही वेळ पाऊस थांबला, पण मैदानावर खड्डे पडल्याने खेळपट्टी इतक्या सहजासहजी सुकवता आली नाही. जवळपास संपूर्ण दिवसभर खेळपट्टी कव्हरखाली राहिली. आज बेंगळुरूमध्ये ऑरेंज अलर्ट होता आणि शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. बंगळुरूमध्ये मंगळवारपासून पाऊस पडत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केले आहे की, गुरुवारी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 98 षटके टाकली जातील. उद्या (दि.१७) सकाळी 8:45 वाजता नाणेफेक तर 9:15 वाजता खेळाला सुरुवात होणार आहे.
न्यूझीलंड विरुद्धची मालिका टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारताला आणखी आठ कसोटी खेळायच्या आहेत. त्यापैकी पाच सामने जिंकावे लागणार आहेत. न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार केन विल्यमसनशिवाय मैदान उतरणार आहे. केन दुखापतग्रस्त असल्याने तो पहिल्या कसोटीला मुकणार आहे.