India Pakistan conflict : भारताच्या बाजूने कोण, विरोधात कोण?
सीमेपलीकडे पाकिस्तानकडून होणार्या कुरापती नव्या नाहीत. मात्र, यंदा पहलगाम हल्ल्याची आगळीक दहशतवाद्यांनी केल्यानंतर भारताने याचे चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानला त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत धडा शिकवला. यादरम्यान भारताच्या या आक्रमक भूमिकेचे पडसाद जागतिक पातळीवरही उमटत राहिले. याच पार्श्वभूमीवर कोणते देश भारताच्या बाजूने उभे राहिले आणि कोणत्या देशांनी पाकिस्तानच्या दहशतवादी भूमिकेला खतपाणी घातले, त्याचा हा लेखाजोखा....
अमेरिका : पाकिस्तानला मदतीची चूक कळाल्यानंतर भारताच्या पाठीशी
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात पाकिस्तानला पायाभूत सेवा-सुविधांसाठी आर्थिक रसद पुरवली. मात्र, पाकिस्तान याचा दहशतवाद पोसण्यासाठी दुरुपयोग करत असल्याचे लक्षात आल्यानंतर आणि लादेनचा पाकिस्तानातच खात्मा केल्यानंतर ट्रम्प यांनी पाकची आर्थिक रसद तोडली आणि भारताच्या भूमिकेचे समर्थन केले.
चीन : भूमिका आधीही दुटप्पी, आताही दुटप्पी!
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांतील संघर्ष पराकोटीस पोहोचत असताना याबद्दल चिंता व्यक्त केली असली तरी पडद्यामागे पाकिस्तानातील दहशतवाद पोसण्यात ते आघाडीवर राहिलेले आहेत, हे सर्वश्रुत आहे. तूर्तास मात्र पाकिस्तानवर चोहो बाजूंनी टीका होत असताना त्यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा आम्ही निषेध करतो, अशी सारवासारव केली आहे.
संयुक्त महासंघ : दहशतवादाचा निषेध, कल भारताच्या बाजूने!
नियंत्रण रेषेवरील सध्याचे वातावरण अतिशय चिंतेचे राहिले असल्याचे संयुक्त महासंघाने म्हटले आहे. भारत कित्येक शतकांपासून दहशतवादात होरपळत आला आहे. त्यामुळे भारताने प्रत्युत्तर दिले, ते रास्त होते, यासाठी दोन्ही देशांनी दक्ष राहिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
जपान : पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा निषेध
पाकिस्तानक डून झालेल्या दहशतवादी कारवायांचा जपानने पूर्ण निषेध केला असून अन्य काही राष्ट्रांच्या भूमिकेचा पुनरुच्चार करत दोन्ही देशातील संघर्षाचे युद्धात रूपांतर होऊ नये, असे नमूद केले आहे.
फ्रान्स : भारताचे पूर्णपणे समर्थन
यादरम्यान फ्रान्सने दहशतवाद पोसणार्या पाकिस्तानचा खरपूस समाचार घेतला. दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत. युद्धजन्य परिस्थितीची झळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू नये, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
संयुक्त अरब अमिरात : दोन्ही देशांकडून शांततेची अपेक्षा
भारत व पाकिस्तान यांच्यातील संघर्ष विक ोपास जात असताना संयुक्त अरब अमिरातने दोन्ही देशांकडून शांततेवर भर देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ताणतणाव कसा कमी करता येईल, यावर भर द्यावा, तसेच परिस्थिती चिघळणार नाही, याकडे लक्ष देण्याची सूचना या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.
इस्रायल : भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे समर्थन
इस्त्रायलने दहशतवादी विरोधी भारताच्या भूमिकेचे जाहीरपणे समर्थन केले आहे. स्वसंरक्षणार्थ पावले उचलावीच लागली, तर त्यात काहीही चुकीचे नाही, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले. पाकला दहशतवादाला खतपाणी घातल्याची किंमत मोजावी लागेल, असेही इस्रायलने म्हटलेले आहे.
रशिया : भारताच्या चोख प्रत्युत्तराचे समर्थन
पहलगामवरील दहशतवादी हल्ल्याचा रशियाने यापूर्वीच निषेध केला असून भारताने जे चोख प्रत्युत्तर दिले, त्याचेही त्यांनी समर्थन केले आहे. मात्र, परिस्थिती अधिक बिघडू नये, यासाठी प्रयत्न करा, असेही त्यांनी म्हटले आहे. दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता आहे, अशीही त्यांची भूमिका आहे.
कतार : राजनैतिक मार्गाने प्रश्न सोडवावा
भारत व पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्याची व्याप्ती आणखी वाढू नये, संघर्ष विकोपास जाऊ नये, यासाठी हा प्रश्न राजनैतिक मार्गाने सोडवावा, अशी सूचना कतारने केली आहे. प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य आवश्यक आहे, यावर या देशाने अधिक भर दिला आहे.
युरोपियन युनियन : भारताचे थेट समर्थन
भारताच्या प्रत्युत्तराचे थेट समर्थन युरोपियन युनियनने केले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी तीव्र निषेध केला आहे. दहशतवादाला भारताने जे उत्तर दिले, ते योग्यच आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. अलीक डेच त्यांनी भारताचे याबाबत पूर्णपणे समर्थन केले आहे.
तुर्की : भारताची कारवाई चिंतेची!
तुर्कीने नेहमीच पाकिस्तानच्या बाजूने उघडपणे राहणे पसंत केले आहे. आताही चोहो बाजूंनी टीका होत असताना त्यांनी पाकिस्तानचीच बाजू उचलून धरली आहे. भारताने केलेली क ारवाई चिंतेची आहे, असे त्यांनी म्हटले आहे. परिस्थिती आणखी चिघळू नये, यासाठी दोन्ही देशांची भूमिका महत्त्वाची असल्याचे या देशाची भूमिका आहे.

