

भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकला ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव दिले गेले. या कारवाईला सिंदूर नाव देण्यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत. सिंदूर हे भारतीय महिलांसाठी सौभाग्याचे प्रतीक आहे. पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या महिलांना या ऑपरेशनद्वारे न्याय मिळावा, हा हेतू आहे. सिंदूरचा रंग शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक आहे. यामुळे हेच सिंदूर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांसाठी काळ ठरले. भारतीय महिलांसाठी महत्त्वाचे असलेल्या या सिंदूरचा इतिहास सुमारे आठ हजार वर्षे जुना आहे.
’सिंदूर’ हे हिंदू विवाहित महिलांच्या कपाळावरचे सौभाग्यचिन्ह आहे. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक नवविवाहित महिलांनी आपले पती गमावले. या हल्ल्यातील मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांच्या स्मृतीची आठवण करून देण्यासाठी हे नाव निवडले गेले.
या ऑपरेशनचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवले. पहलगाम हल्ल्यातील विधवांच्या वेदना आणि दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारताचा कणखर निर्धार व्यक्ते करण्यासाठी त्यांनी हे नाव निवडले.
भारतीय संस्कृतीमध्ये सिंदूरला जवळपास 8 हजार वर्षांचा इतिहास आहे. स्त्रिया 8 हजार वर्षांपूर्वी सिंदूर लावत होत्या. असे अनेक दाखले प्राचीन इतिहासात सापडतात. सिंधू आणि हडप्पा संस्कृतीमध्ये सिंदूरचा वापर होत असल्याचे सांगितले जाते. उत्खननात सापडलेल्या प्राचीन मूर्तींवर सिंदूर आढळले आहे, ज्यामुळे या दाव्याला पुष्टी मिळते.
उत्खननात मिळालेल्या वस्तूंच्या अभ्यासानुसार, सिंदूर बनवण्यासाठी हळद, तुरटी किंवा चुना वापरला जात असे.
वेद आणि पुराणांमध्ये सिंदूर वेद आणि पुराणांमध्येही सिंदूरचा उल्लेख आहे. महाभारतातील द्रौपदी आणि रामायणातील सीता व हनुमान यांच्या कथांमध्ये सिंदूरचा उल्लेख आढळतो. यावरून हिंदू धर्मात सिंदूरचे महत्त्व फार पूर्वीपासून आहे, हे स्पष्ट होते.
महिलांच्या भांगात भरला जाणारा सिंदूर हा लाल रंगाचा असतो. दोन्ही भुवयांत लावलेली बिंदी आज्ञाचक्राला सक्रिय ठेवते. मानसिक शक्ती व स्मरणशक्ती वाढवण्यास पोषक ठरते, असे मानतात.त्यामुळे पूर्वी पासून स्त्रिया या गोष्टी वापरतात.
ऑपरेशन सिंदूर’ या नावावरून चित्रपट काढण्यासाठी निर्मात्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. निर्मात्यांनी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजशी (एफडब्ल्यूआयसीई) याबाबत संपर्कसाधला आहे. आतापर्यंत जवळपास 15 चित्रपट निर्माते आणि स्टुडिओंनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या टायटलची नोंदणी करण्यासाठी अर्ज केले आहेत.
बिहारच्या एका दांपत्याला ‘ऑपरेशन सिंदूर’च्या दिवशी कन्यारत्न प्राप्त झाले. भारताने दहशतवादविरोधात केलेल्या कारवाईचे कौतुक करत, त्याच्या सन्मानार्थ बिहारच्या या दांपत्याने आपल्या मुलीचे नाव ‘सिंदुरी’ असे ठेवले.अशाच प्रकारे देशभरात जवळपास 12 मुलींचे नामकरण झाल्याच्या नोंदी आहेत.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पहिल्या दिवशी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले. ही ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत:
पाकिस्तान : मुरिदके (लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय), बहावलपूर (जैश-ए-मोहम्मदचे ठिकाण), सियालकोट (हिजबुल मुजाहिदीनचे ठिकाण), तेहराकलां (जैश-ए-मोहम्मदचे ठिकाण)
पाकव्याप्त काश्मीर: मुजफ्फराबाद (दोन ठिकाणी), कोटली (दोन ठिकाणी), बरनाला. अजूनही ही कारवाई सुरुच आहे.