

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये बुधवारी औपचारिकरीत्या संरक्षण करार झाल्यानंतर भारताने गुरुवारी या घडामोडीवर अधिकृत प्रतिक्रिया दिली. परराष्ट्र मंत्रालयाने या कराराचा राष्ट्रीय सुरक्षेवर, तसेच प्रादेशिक आणि जागतिक स्थैर्यावर होणारा संभाव्य परिणाम बारकाईने तपासण्याचे जाहीर केले आहे.
हा करार पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या रियाध भेटीदरम्यान झाला. ‘स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स अॅग्रीमेंट’ या नावाने झालेल्या या करारामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की, कोणत्याही एका देशावर झालेला हल्ला हा दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या या कराराच्या बातम्या आमच्या निदर्शनास आल्या आहेत. हा दीर्घकाळापासून चर्चेत असलेला मुद्दा औपचारिक स्वरूपात आला आहे. आम्ही या कराराचे परिणाम सखोलपणे तपासू.
भारताने यावर थेट टीका न करता संतुलित भूमिका घेतली असून, राष्ट्रीय सुरक्षेचे हित जपण्यावर भर दिला आहे. या करारामुळे मध्य पूर्वेत, तसेच दक्षिण आशियातील सामरिक समीकरणे बदलण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. पश्चिम आशियात मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक वास्तव्यास असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही भारतासमोर महत्त्वाचा आहे. त्यामुळे भारताने सावध आणि वास्तववादी धोरण अवलंबल्याचे दिसून येते. करारामुळे प्रादेशिक सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.