

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा भारत आणि चीन पुन्हा एकदा दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले. तणावपूर्ण नातेसंबंध कोणासाठीही फायदेशीर नसतात. २०२० मध्ये गलवान खोऱ्यात जे घडले ते समस्या सोडवण्याचा मार्ग नव्हता. ऑक्टोबर २०२४ पासून दोन्ही देशांतील संबंध हळूहळू सुधरत आहेत, असे ते म्हणाले. परराष्ट्र मंत्री एका संवाद सत्रात बोलत होते.
आम्हाला माहिती आहे की भविष्यातही भारत आणि चीनमध्ये मतभेद असू शकतात, परंतू ते संघर्षात न बदलता इतर मार्गांनी सोडवता येतील, असे परराष्ट्र मंत्री म्हणाले. गलवान खोऱ्यातील संघर्षांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, २०२० मध्ये जे घडले ते खरोखरच वेदनादायक होते. तो फक्त संघर्ष नव्हता, तर लेखी करारांकडे दुर्लक्ष करण्यात आले. असे नाही की हा मुद्दा पूर्णपणे संपला आहे, आम्ही अजूनही घटनेशी संबंधित काही भाग हाताळत आहोत.
एस. जयशंकर म्हणाले की, दोन्ही देश अनेक मुद्द्यांवर स्पर्धा करतो, मात्र यासाठी लढले नाही पाहिजे. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंध कोणत्याही बाजूच्या हिताचे नाहीत कारण जर सीमेजवळ शांतता भंग झाली तर उर्वरित संबंध देखील योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत. ऑक्टोबर २०२४ पासून दोन्ही देशांतील संबंधांमध्ये काही सुधारणा झाल्याचे आम्हाला वाटते, असे ते म्हणाले. दोन्ही देश त्यावर काम करत असल्याचे ते म्हणाले. चिनी परराष्ट्रमंत्र्यांना अनेक वेळा भेटलो आहे आणि माझे सहकारीही भेटले आहेत. २०२० मध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई आपण करू शकतो का हे पाहण्यासाठी आम्ही टप्प्याटप्प्याने प्रयत्न करत आहोत, असे केंद्रीय मंत्री जयशंकर म्हणाले.