

नवी दिल्ली : १ जानेवारी २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ दरम्यान या १३ महिन्यांत भारत-बांगलादेश सीमेवर भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना २ हजार ६०१ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृह मंत्रालयाने बुधवारी राज्यसभेत दिली.
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की १ जानेवारी २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ दरम्यान या २,६०१ बांगलादेशींना अटक करण्यात आली. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जानेवारी २०२५ मध्ये १७६ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. डिसेंबर २०२४ मध्ये २५३ नोव्हेंबरमध्ये ३१०, ऑक्टोबरमध्ये ३३१, सप्टेंबरमध्ये ३००, ऑगस्टमध्ये २१४, जुलैमध्ये २६७ आणि जूनमध्ये २४७ जणांना अटक करण्यात आली असल्याची आकडेवारी त्यांनी दिली. मे २०२४ मध्ये सर्वात कमी ३२ घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये ९१, मार्चमध्ये ११८, फेब्रुवारीमध्ये १२४ आणि गेल्या वर्षी जानेवारीमध्ये १३८ जणांना अटक करण्यात आले आहे.
दोन्ही देशांच्या सीमेवरील सुरक्षा वाढवली असल्याची माहिती गृह राज्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. ते म्हणाले की, सरकारने सीमेवर देखरेख, मनुष्यबळ आणि तांत्रिक बाबींमध्ये वाढ केली असून याद्वारे भारत-बांगलादेश सीमा सुरक्षा मजबूत केली आहे. नाईट व्हिजन यंत्र, सीसीटीव्ही कॅमेरे, आयआर सेन्सर्स सारखी देखरेख उपकरणे सीमेवर असल्याचे त्यांनी सांगितले. सीमेवर सतत गस्त, नाकाबंदी, निरीक्षण चौक्या यामुळे ही या कारवाया करण्यात आल्या आहेत. स्थानिक पोलिस आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश (बीजीबी) सोबत संयुक्त ऑपरेशन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्ली पोलिसांनी आग्नेय आणि दक्षिण दिल्लीतून केलेल्या कारवाईत १३ बांगलादेशींना अटक केली. हे सर्वजण बेकायदेशीरपणे भारतात घुसले होते. त्यांच्याकडून कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली आहे. या सर्वांना दिल्लीच्या वेगवेगळ्या भागातून पकडण्यात आले आहे. दिल्लीत बेकायदेशीर बांगलादेशींविरुद्ध शोध मोहीम सुरूच असल्याचे पोलिसांनी सांगितले.