

नवी दिल्ली : 2026-27 च्या हंगामासाठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतींमध्ये (एमएसपी) वाढ करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य आणि हमीभाव मिळावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
भाताचा एमएसपी 72 रुपयांनी वाढवून 2,441 रुपये करण्यात आला आहे. तुरीचा एमएसपी 450 रुपयांनी वाढवून 8,450 रुपये निश्चित करण्यात आला आहे. तर, सोयाबीनचा एमएसपी 380 रुपयांनी वाढवून 5,708 रुपये केला आहे. कापसाचा एमएसपी 557 रुपयांनी वाढवून 8,267 रुपये केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सूर्यफूल बियांमध्ये 622 रुपये, तीळ 500 रुपये आणि कारळे 515 रुपयांनी सर्वाधिक वाढ केली आहे.
धान्य, डाळी, तेलबिया आणि इतर खरीप पिकांसाठीही किमान आधारभूत किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. शेतकर्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत किमान 50 टक्के किंवा त्याहून अधिक नफा मिळेल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मूग, बाजरी, मका आणि तूर या पिकांवर अनुक्रमे 61 टक्के, 56 टक्के, 56 टक्के आणि 54 टक्के इतका अपेक्षित नफा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. केंद्राने 2018-19 च्या अर्थसंकल्पीय घोषणेनुसार, एमएसपी ही सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट निश्चितीचे धोरण ठेवले आहे.
यंदा कोणत्या पिकाला किती एमएसपी?
तांदूळ : 2,441 रु.
ज्वारी : 4,023 रु.
बाजरी : 2,900 रु.
नाचणी : 5,205 रु.
मका : 2,410 रु.
तूर : 8,450 रु.
मूग : 8,780 रु.
उडीद : 8,200 रु.
शेंगदाणा : 7,517 रू.
सूर्यफूल बिया : 8,343 रु.
पिवळे सोयाबीन : 5,708 रु.
तीळ : 10,346 रु.
कारळे : 10,052 रु.
कापूस : 8,267 रु.