

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) चे माजी मुख्य वित्तीय अधिकारी शिवकुमार के यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये मुलीच्या मृत्यूनंतर प्रत्येक टप्प्यावर कसा भ्रष्ट यंत्रणेचा सामना करावा लागला याची सविस्तर माहिती दिली आहे. या पोस्टने सोशल मीडियावर भ्रष्टाचाराविरोधा तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Corruption viral story : एका वडिलांना आपल्या मुलीच्या मृत्यूचे पराकोटीचे दु:ख सहन करावे लागले. मात्र यानंतर अंत्यसंस्कार, शवविच्छेदन अहवाल आणि मृत्यू प्रमाणपत्रासाठी प्रत्येक टप्प्यावर लाचाने पोखरलेल्या यंत्रणेचाही सामना करावा लागला. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) चे माजी मुख्य वित्तीय अधिकारी शिवकुमार के यांनी (आता हटवलेल्या )लिंक्डइन पोस्टमध्ये आपली व्यथा मांडली. अल्पवधीत ही पोस्ट व्हायरल झाली आणि भ्रष्टाचाराने पोखलेल्या सरकारी यंत्रणेविरोधात तीव्र संताप व्यक्त झाला.
३४ वर्षीय अक्षया शिवकुमार यांचे १८ सप्टेंबर रोजी ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले. आयआयएम-अहमदाबाद येथील माजी विद्यार्थी असणार्या अक्षया यांनी ११ वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात काम केले होते. त्यांचा मृत्यू हा शिवकुमार के यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
शिवकुमार के यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये आपली व्यथा मांडताना म्हटलं की, "मुलीचा मृत्यूनंतर सर्वप्रथम मृतदेह घेवून जाण्यासाठी लागणार्या रुग्णवाहिकेसाठी लाच मागितली गेली. त्यानंतर फिर्याद दाखल करण्यासाठी तसेच शवविच्छेदन अहवाल मिळविण्यासाठी पोलिसांनी लाच मागितली. पावतीसाठी स्मशानभूमीला पैसे दिले गेले आणि शेवटी मुलीच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी शहरातील बेंगळुरू महानगरपालिके (BBMP) मध्येही लाचेची मागणी झाली."
शिवकुमार यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, बेलांदूर पोलिस स्टेशनमधील एक निरीक्षक इतका उद्धट होता की, एकुलत्या एका मुलीला गमावल्या बापाबद्दल त्याला सहानुभूती नव्हती.मी लाच दिली कारण माझ्याकडे पैसे होते; अशा परिस्थितीत एक गरीब माणूस काय करेल, असा सवालही त्यांनी केला. काही तासांनी शिवकुमार यांनी लिंक्डइन या सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवरील आपली पोस्ट हटवली; पण तोपर्यंत शिवकुमार यांच्या हटवलेल्या पोस्टचे स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले.
शिवकुमार यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर भ्रष्ट यंत्रणेविरोधात संतापाचा आगडोंब उसळला. अनेकांनी बंगळूरुमधील वाढत्या भ्रष्टाचारावर केली, अनेकांनी जबाबदारीचा अभाव आणि समाज मागे पडत आहे का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.पोलिस आणि सरकारी अधिकारी देखील इतके असंवेदनशील आहेत हे खूप दुर्दैवी आहे. त्यांना समाजात स्थान नाही. त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे," असे एकाने म्हटलं. लाचखोरीमुळे देश पिछाडीवर जात आहे. लोक इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा पैशाला जास्त महत्त्व देऊ लागले आहेत. त्यांना प्रामाणिक अधिकारी म्हणण्यापेक्षा त्यांना श्रीमंत म्हणायला आवडते. आपण समाज म्हणून लयास जात आहोत, असे परखड मत एकाने व्यक्त केले आहे. दरम्यान, एका व्यक्तीने असाच अनुभव शेअर केला आणि म्हटले की त्याला मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर काही महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी १२,००० रुपये द्यावे लागले.
बेनलांदूर पोलिस स्टेशनमधील एक पीएसआय आणि एक पोलिस कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे, असे डीसीपी व्हाइटफील्ड यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट केले. पोलिस विभाग कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकारच्या अनुचित वर्तन सहन करणार नाही," असे पोलिसांनी सांगितले.