नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ला सामन्यांच्या वेळी मैदानाच्या परिसरात तसेच सामन्यांच्या प्रसारणा दरम्यान तंबाखू, अल्कोहोलच्या जाहिरातींवर बंदी घालण्यास सांगितले आहे. यासंबंधी आरोग्य सेवा महासंचलनालयाने (डीजीएसएस) आयपीएलचे अध्यक्ष अरुण सिंग धुमल यांना पत्र लिहीले आहे. दरवर्षी तंबाखूमुळे भारतात १४ लाख मृत्यू होतात, असे पत्रात म्हटले आहे. २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल हंगामापूर्वी सरकारने हा पत्र व्यवहार केला आहे.
या पत्रात 'डीजीएचएस'चे प्रमुख अतुल गोयल यांनी भारतातील हृदयरोग, कर्करोग, दीर्घकालीन फुफ्फुसांचे आजार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या असंसर्गजन्य आजारांच्या (एनसीडी) वाढत्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी निदर्शनास आणून दिले की देशातील वार्षिक मृत्यूच्या आकडेवारीपैकी ७० टक्क्यांहून अधिक मृत्यूंसाठी तंबाखू आणि अल्कोहोल हे जबाबदार प्रमुख घटक आहेत.
खेळ आणि संबंधित आयपीएल सामने/कार्यक्रम आयोजित केलेल्या मैदानाच्या परिसरात तसेच प्रसारणा दरम्यान सर्व प्रकारच्या तंबाखू आणि अल्कोहोलच्या जाहिरातींवर पूर्ण बंदी घाला.
आयपीएलशी संबंधित ठिकाणांवर तंबाखू आणि अल्कोहोल विक्रीवर बंदी.
तंबाखू किंवा अल्कोहोलशी संबंधित ब्रँडचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे समर्थन करणाऱ्या खेळाडू आणि समालोचकांना प्रोत्साहन देऊ नये.
केंद्राने पत्रात म्हटले की, दरवर्षी जवळजवळ १४ लाख मृत्यूंसाठी तंबाखूचा जबाबदार आहे. ज्यामुळे भारत जागतिक स्तरावर तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल, भारतातील सर्वाधिक पाहिले जाणारे क्रीडा स्पर्धा असल्याने, तंबाखू आणि अल्कोहोलचा कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रचार जनतेला आरोग्याविषयी चुकीचा संदेश देईल आणि प्रभावित करेल. निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट खेळाडू तरुणांसाठी आदर्श आहेत. देशातील सर्वात मोठे क्रीडा व्यासपीठ म्हणून, आयपीएलची सार्वजनिक आरोग्याला प्रोत्साहन देण्याची आणि सरकारच्या आरोग्य उपक्रमांना पाठिंबा देण्याची सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे, असे पत्रात म्हटले आहे.