

नवी दिल्ली : अमेरिका-इराणमध्ये शांतता करार झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे ३० टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे भारताची अर्थगती कॅलेंडर वर्ष २०२६ मध्ये वाढेल, असा सुधारित अंदाज गोल्डमन सॅक्सने वर्तविला आहे. महागाई निर्देशांकातही घट होईल, असा सुधारित अंदाजही या संस्थेने वर्तविला आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे महागाई वाढण्याबरोबरच उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने गोल्डमन सॅक्सने २०२६ मध्ये जीडीपी ०.३ टक्क्याने वाढून ६.८ टक्क्यांवर जाईल, असा अंदाज वर्तविला आहे. तर महागाई निर्देशांक ०.२ टक्क्याने वाढून ४.४ टक्क्यांवर जाईल, असे म्हटले आहे. याशिवाय चालू खात्यातील तुटीचा अंदाज ०.२ टक्क्याने कमी करून १.१ टक्क्यावर आणला आहे.
इंधनाच्या किमतींमध्ये पूर्वी झालेल्या वाढीमुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत उपभोगाची वाढ मंदावेल, असा गोल्डमन सॅक्सचा अंदाज असला तरी तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे किरकोळ इंधन दरवाढीची गरज लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या तिमाहीनंतर घरगुती खर्चावरील अतिरिक्त दबाव मर्यादित राहील, असे त्यांचे मत आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की, जागतिकस्तरावर वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे वित्तीय दबाव कमी होण्याची अपेक्षा आहे. जागतिक युरियाच्या किमतींमधील तीव्र घसरणीमुळे पूर्वीच्या अपेक्षेच्या तुलनेत खत अनुदान वाढीचा धोका कमी होईल.
सरासरी पर्जन्यमान घटणार आहे. तसेच गेले साडेतीन महिने झालेल्या इंधन दरवाढीचा परिणाम याचा एकत्रित परिणाम तात्पुरती मागणी घटण्यात होऊ शकतो, असा इशाराही गोल्डमन सॅक्सने दिला आहे.