

राजेंद्र पाटील
नवी मुंबई : दिवाळीच्या काळात सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेलेले सोन्याचे दर लक्ष्मीपूजनानंतरच्या चार दिवसांत तोळ्यामागे 8 हजार रुपयांनी घसरले; तर चांदीच्या दरात किलोमागे 38 हजार रुपयांची घट झाली. नरकचतुर्दशीला सोने एक लाख 31 हजार रुपये प्रति तोळे दराने विकले गेले; तर चांदीचा किलोमागे दर एक लाख 91 हजार रुपये होता.
दिवाळीनंतर चार दिवसांत म्हणजे शनिवारी सोने प्रति तोळे एक लाख 23 हजार रुपये तोळे, तर चांदी एक लाख 53 हजार रुपये किलोपर्यंत घसरली. गेल्या आठ दिवसांत राज्यात 1700 कोटी रुपयांच्या सोन्याची खरेदी करण्यात आली. त्यात मुंबईचा वाटा 1100 कोटींचा होता. मुंबई, नाशिक, जळगाव, पुण्यासह राज्यात अंदाजे 460 टन तर एकट्या मुंबईत सर्वाधिक 320 टन सोन्याची विक्री झाली.
धनत्रयोदशीपासून सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात दररोज वाढ होत होती. नरकचतुर्दशीला सोने 1 लाख 31 हजार रुपये तोळे होते, तर चांदी 1 लाख 60 हजार रुपये किलो होती. लक्ष्मीपूजनादिवशी सोने प्रति तोळे 3 हजार तर चांदी किलोमागे 5 हजार रुपयांनी घसरली. यामुळे पुणेसह जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये सोने 1 लाख 28 हजार रुपये तर चांदीला 1 लाख 55 हजार रुपये किलोचा दर होता, अशी माहिती जळगावचे सराफी व्यावसायिक सुशील बाफना यांनी दिली.