

नवी दिल्ली : अंतराळ आता केवळ सहायक तंत्रज्ञान उरले नसून ते भविष्यातील युद्धांचे सर्वांत निर्णायक क्षेत्र ठरणार आहे. भारताला आपल्या प्रतिस्पर्धी देशांच्या तुलनेत या क्षेत्रात वेगाने क्षमता वाढवावी लागेल, अन्यथा हे अंतर अधिक वाढत जाईल, असे प्रतिपादन संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेे(डीआरडीओ) चे प्रमुख समीर व्ही. कामत यांनी गुरुवारी केले.
दिल्लीतील माणेकशॉ सेंटर येथे आयोजित चौथ्या भारतीय संरक्षण-अंतराळ परिषदेत ते बोलत होते. कामत म्हणाले, अंतराळ क्षेत्रात भारतासमोर मोठी आव्हाने आहेत. ती अधिक गुंतवणूक आणि सहकार्याशिवाय पूर्ण करणे कठीण आहे. जिथे इस्रो देशाच्या नागरी अंतराळ कार्यक्रमाचे नेतृत्व करते, आता लष्करी अंतराळाशी संबंधित कामांची जबाबदारी आली आहेे. डिफेन्स स्पेस एजन्सीच्या स्थापनेनंतर ही जबाबदारी अधिक वाढली आहे. सध्या हे काम डीआरडीओच्या एकूण कामाचा छोटा हिस्सा असले तरी, त्याचा विस्तार वेगाने होत आहे.
नवीन सहकार्य मॉडेल
हे तांत्रिक अंतर कमी करण्यासाठी डीआरडीओने नवीन सहकार्य मॉडेल स्वीकारले आहे. त्यामध्ये स्टार्टअप्स, आणि शैक्षणिक संस्थांना जोडले जात आहे. अनेक उद्योग शैक्षणिक केंद्रांमध्ये अंतराळाला प्राधान्य देण्यात आले आहे. येणार्या वर्षांत भारत या क्षेत्रात आवश्यक तांत्रिक आत्मनिर्भरता प्राप्त करू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या संशोधनावर भर
* सध्या स्पेस सिच्युएशनल अवेअरनेसवर काम
* लष्करी वापरासाठी दळणवळण यंत्रणा मजबूत करणे
* अंतराळ-आधारित पाळत ठेवणे व इमेजिंग रडारवर काम
* शत्रूच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणाची सुरुवातीलाच ओळख पटवून देणारे तंत्रज्ञान विकसित करण्यावरही भर