

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयाेजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांवर आज ( दि.४) निवडणूक आयाेगाने सडेताेड प्रत्युत्तर दिले. अशा प्रकारच्या आक्षेपांना बळी न पडता संवैधानिक संयम बाळगण्याचा निर्णय घेतला असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्या ( दि. ५) मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचार काळात राजकीय पक्षांवर टीकेची झोड उठवताता 'आप'चे नेते अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार १८ फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत. त्यांना निवृत्तीनंतर सरकारी पद हवे आहे, निवडणूक आयोग भाजपच्या कथित निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाकडे दुर्लक्ष करत आहे, असे गंभीर आरोप त्यांनी केले होते.
राजीव कुमारांवर आम आदमी पक्षाने केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाने आज प्रत्युत्तर दिले. X वरील एका पोस्टमध्ये, निवडणूक आयोगाने म्हटले आहे की," दिल्ली विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला बदनाम करण्यासाठी वारंवार जाणीवपूर्वक दबाव आणण्याच्या युक्त्यांची नोंद ३ सदस्यीय आयोगाने एकत्रितपणे घेतली आहे. निवडणूक काळात अशा प्रकारे दबाव आणला गेला की, आयोग जणू काही एक सदस्यीय संस्था आहे. आम्ही तीन सदस्यीय संस्था आहोत. आम्ही अशा आक्रोशांना विवेकाने, संयमाने आणि आक्षेपांना बळी न पडता संवैधानिक संयम बाळगण्याचा निर्णय घेतला आहे."