

नवी दिल्ली : भारत सरकारच्यावतीने विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उत्कृष्ट योगदानासाठी देणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार २०२५ चे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. जगविख्यात खगोल भौतिकशास्त्रज्ञ प्रा. डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांना 'विज्ञान रत्न' या पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात आले. तसेच अन्य दोन श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील ६ शास्त्रज्ञ आणि संशोधकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि संशोधकांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानासाठी, विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा आणि विज्ञान टीम, या चार श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात आजीवन योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना देण्यात येणारा विज्ञानरत्न पुरस्कार प्रसिद्ध खगोल भौतिकशास्त्रज्ञ प्रा. डॉ. जयंत विष्णू नारळीकर मरणोत्तर प्रदान करण्यात आला. त्यांच्यावतीने आयुकाचे संचालक डॉ. रघुनाथन श्रीआनंद यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नारळीकर यांनी 'होयल-नारळीकर सिद्धांत' विकसित करून गुरुत्वाकर्षण आणि द्रव्य निर्मितीचे एकत्रीकरण करणारा स्थिर अवस्था ब्रह्मांडाचा आराखडा मांडला होता.
विज्ञान श्री पुरस्काराने नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एस. वेंकट मोहन, यांना पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच न्यूट्रॉन बीमलाइन्स आणि सुपरकंडक्टिव्हिटी क्षेत्रातील योगदानासाठी (परमाणु ऊर्जा) डॉ. युसूफ मोहम्मद सेख (बार्क, मुंबई यांसह - कृषी विज्ञानसाठी: डॉ. ज्ञानेंद्र प्रताप सिंह (नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस, नवी दिल्ली) – जीव विज्ञान क्षेत्रातील मानवी जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे रोग संवेदनशीलता आणि इतिहासाचे संशोधना साठी डॉ. कुमारसामी थंगराज (CSIR-CCMB, हैदराबाद), रसायनशास्त्र क्षेत्रात स्वस्त पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रा. तलाप्पिल प्रदीप (IIT मद्रास),प्रा अनिरुद्ध भालचंद्र पंडित (इंजीनियरिंग विज्ञान), ; प्रा. महान एमजे (गणित आणि कंप्यूटर विज्ञान); श्री जयन एन (अंतरिक्ष विज्ञान आणि प्रौद्योगिकी)यांना विज्ञान श्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.
विज्ञान युवा या श्रेणीत विविध क्षेत्रांतून अनेक युवा संशोधकांना सन्मानित करण्यात आले, ज्यात भौतिकशास्त्रात प्रा. अमित कुमार अग्रवाल आणि प्रा. सुहृद श्रीकांत मोरे; गणित आणि संगणक विज्ञानात प्रा. सब्यसाची मुखर्जी आणि प्रा. श्वेता प्रेम अग्रवाल; अभियांत्रिकी विज्ञानात प्रा.. आर्कप्रभा बासू; वैद्यकीय क्षेत्रात डॉ. सुरेश कुमार; अंतराळ विज्ञानात श्री अंकुर गर्ग; तंत्रज्ञान आणि नाविन्यात प्रा. मोहनशंकर शिवप्रकाशम,
डॉ. जगदीस गुप्ता कपुगंती (कृषि विज्ञान); डॉ. सतेन्द्र कुमार मंगरौठिया (कृषि विज्ञान); श्री देबार्का सेनगुप्ता (जैविक विज्ञान); डॉ. दीपा अगाशे (जैविक विज्ञान); डॉ. दिब्येंदु दास (रसायन विज्ञान); डॉ. वलीउर रहमान (पृथ्वी विज्ञान) यांचा समावेश आहे. अरोमा मिशन टीमला सुगंधी पिकांच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि ग्रामीण रोजगार वाढवल्याबद्दल विज्ञान टीम पुरस्कार प्रदान करण्यात आला.