

Yashotsav 2026 Delhi
नवी दिल्ली : योग्य संधी, मार्गदर्शन आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नसते याची प्रचिती दीपस्तंभच्या यशोत्सव कार्यक्रमातून येत असल्याचे प्रतिपादन दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केले. तर जेव्हा शिक्षण आणि संधी समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतील तेव्हाच विकसित भारताचे स्वप्न साकार होईल, अशा भावना ज्येष्ठ भाजप नेते खा. विनोद तावडे यांनी व्यक्त केल्या.
दीपस्तंभ फाउंडेशनतर्फे राजधानी दिल्लीत ‘यशोत्सव २०२६’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला मुख्यमंत्री रेखा गुप्ता, खा. विनोद तावडे यांच्यासह विनय सहस्रबुद्धे, केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील उपसचिव इरा सिंघल, वरिष्ठ आयएएस अधिकारी अय्याज तांबोळी, दीपस्तंभ फाउंडेशनचे प्रमुख यजुवेंद्र महाजन प्रामुख्याने उपस्थिती होते.
या प्रसंगी दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पातून यशस्वी झालेले मनोज पाटील (आयपीएस), बापूसाहेब गायकवाड (आयपीएस), सूरज तिवारी (आयएएस), रेणुका केकन (आयआरएस), अक्षय पवार (आयएफएस), शुभम पाटील (आयएफएस), विशाल कुमार आनंद, हृषिकेश पवार (एसटीआय), प्रणाली धवन, दिलराज मीणा, पंकज गिरासे आणि मंगल भिवंडीकर यांच्यासह अनेक यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
इरा सिंघल या २०१४ बॅचच्या आयएएस अधिकारी आहे. दिव्यांग असून त्यांनी कुठलेही आरक्षण न घेता भारतातून प्रथम क्रमांक मिळवला होता. त्या स्कोलियोसिस आजाराने ग्रस्त आहेत. स्कोलियोसिसमध्ये पाठीचा कणा सरळ नसून एका बाजूला वाकलेला असतो.
त्यांच्याबद्दलची एक आठवण सांगताना रेखा गुप्ता म्हणाल्या की, काही वर्षांपूर्वी इरा सिंघल दिल्लीच्या एका झोनच्या उपायुक्त होत्या आणि मी नगरसेविका होते. सर्व आव्हानांवर मात करून दिल्लीतील विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्या धडपडत होत्या. त्या ज्या पद्धतीने काम करत होत्या, धडाडीने प्रकल्पांची पाहणी करायच्या आणि ५०-६० अधिकारी त्यांच्या मागे असायचे. त्याचे कौतुक तेव्हाही वाटत होते आणि आजही वाटते. हे एक उदाहरण आहे आणि अशा सगळ्याच लोकांचे कार्य अनेकांना प्रेरणादायी असल्याचेही रेखा गुप्ता म्हणाल्या.