

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानीत हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) पुन्हा एकदा 'गंभीर' श्रेणीत पोहोचला आहे. यामुळे हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) मध्ये तात्काळ प्रभावाने श्रेणीबद्ध उपाय योजनांचा (ग्रॅप) तिसरा टप्पा लागू केला आहे.
हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने म्हटले की, दिल्लीचा एक्यूआय २८ जानेवारीला २७६ नोंदवला गेला. मात्र, २९ जानेवारी (बुधवारी) यामध्ये तीव्र वाढ दिसून आली. बुधवारी, दिल्लीत एक्यूआय ३६५ नोंदवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांतही अशाच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे, असे आयोगाने आदेशात म्हटले. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून, ग्रॅपचा तिसरा टप्पा ताबडतोब लागू करण्यात आला आहे. जर एक्यूआय ४०० च्या वर गेला तर, चौथा टप्पा लागू केला जाईल, असेही आयोगाने आदेशात म्हटले आहे. सर्व संबंधित संस्थांना ग्रॅपच्या नियमांचे पालन करण्यास आयोगाने सांगितले आहे.