नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा-
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई येथील विमानतळाला देण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक दिल्लीत पार पडली. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रामुख्याने या बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर दिल्लीत पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत तांत्रिक मुद्द्यांचा आढावा घेण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून केंद्र सरकारकडे आला आहे, तो लवकरच केंद्रीय कॅबिनेटसमोर सादर केला जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ लोकभावना लक्षात घेवून या प्रस्तावावर निश्चितच सकात्मक निर्णय घेईल, असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले. दरम्यान, बैठकीला हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव वूमलनमंग वुआलनाम, विमानतळ नामकरण कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे, खासदार धैर्यशील पाटील, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार राजू पाटील यांच्यासह विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.