

नवी दिल्ली : नाना पटोले यांच्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण? याचा शोध या आठवड्यात संपण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री अमित देशमुख यांचे नाव या पदासाठी चर्चेत होते. त्यानंतर माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचेही नाव चर्चेत आले. दरम्यान, काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मंत्री सतेज पाटील, विश्वजीत कदम, विजय वडेट्टीवार यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर नाना पटोले यांनी पक्ष नेतृत्वाकडे पदमुक्त करा, असे गाऱ्हाणे घातल्याच्याही चर्चा होत्या. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी राहुल गांधींची भेट घेतली. या भेटीमध्ये प्रदेशाध्यक्षपदी नव्या आणि तरुण चेहऱ्याला संधी द्या, अशी मागणी नाना पटोले यांनी केल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षपदी नव्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. विश्वजीत कदम आणि सतेज पाटील पश्चिम महाराष्ट्रातून तर हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार विदर्भातून आणि अमित देशमुख मराठवाड्यातून येतात. ज्या भागातील प्रदेशाध्यक्ष असेल त्याव्यतिरिक्त राज्याच्या इतर भागातून काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते ठरवले जातील. त्यामुळे ही दोन पदे देताना काँग्रेस प्रादेशिक आणि सामाजिक समीकरणे राखण्याचाही प्रयत्न करणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे बुधवारी दिल्लीबाहेर होते. त्यामुळे निर्णय होऊ शकला नाही. खर्गे दिल्लीत आल्यानंतर चर्चेत असलेल्या नावांसह आणखी काही नावही समोर येऊ शकतात. ज्या नावावर राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची सहमती होईल त्यांच्या पारड्यात अध्यक्षपद पडेल.