

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : चीनने २०२५ मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आपल्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या (पीएलए) सैनिकांच्या तैनातीमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात केली असल्याची माहिती भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. वादग्रस्त सीमेवर अनेक वर्षांच्या तणावानंतर भारत-चीन संबंध स्थिर होत असल्याचे संकेत मिळत असतानाच या नवीन घडामोडी समोर आल्या आहेत. यामुळे भारत-चीन संबंध सुधारत असल्याचे संकेत मिळत आहेत.
संरक्षण मंत्रालयानुसार, एलएसी लगतचे भाग आणि पारंपरिक प्रशिक्षण क्षेत्रांमध्ये आता कंबाइंड आर्म्स ब्रिगेडच्या आकाराच्या १० तुकड्या तैनात राहिल्या आहेत. तसेच एलएसीच्या सर्व सेक्टरमध्ये भारतीय सैन्याची तैनाती मजबूत, चांगल्या स्थितीत व आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे.
दोन्ही बाजूंनी चर्चेचे मार्ग खुले
चिनी सैनिकांच्या तैनातीमधील ही घट भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या राजकीय, मुत्सद्दी व लष्करी संपर्काच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. यामुळे उत्तर सीमांवर अधिक स्थिरता आणण्यास मदत झाली. यावर्षी भारत व चीनने चर्चेचे अनेक मार्ग पुन्हा सुरू केले, असेही मंत्रालयाचे म्हटले आहे.
पुन्हा सुरू झाली चर्चा
‘वर्किंग मेकॅनिझम फॉर कन्सल्टेशन अँड कोऑर्डिनेशन’ (डब्ल्यूएमसीसी) च्या ३३ व ३४ व्या फेऱ्यांच्या बैठका मार्च व जुलै २०२५ मध्ये पार पडल्या. सीमावादावरील विशेष प्रतिनिधींची चर्चाही पुन्हा डिसेंबर २०२४ व ऑगस्ट २०२५ मध्ये पार पडल्या. ऑगस्ट २०२५ मध्ये तियानजिन येथे झालेल्या 'शांघाय सहकार्य संघटना' (एससीओ) शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी यांच्या चीन दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधांमधील सुधाराला बळ मिळाले.