पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते चंपाई सोरेन (Champai Soren) हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने झारखंडमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रविवार,१८ ऑगस्ट रोजी त्यांनी सोशल मीडियावर फ्लॅटफॉर्म Xवर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे झारखंडमधील सत्ताधारी आघाडी सरकार संकटात सापडले आहे. जाणून घेवूया सोरेन यांच्या भूमिकेचा झारखंड सरकारवर कितपत परिणाम होणार याविषयी..
चंपाई सोरेन यांनी रविवारी Xवरील पोस्टमध्ये म्हटलं की, हेमंत सोरेन यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर मला राजीनामा देण्यास सांगण्यात आले. हा माझा स्वाभिमानाचा धक्का होता. हेमंत सोरेन तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आमदार आणि इतर आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीचा अजेंडा आपल्याला माहिती नसल्याचा दावाही त्यांनी केला अहे. आमदारांची बैठक बोलावण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असला तरी, मला बैठकीचा अजेंडाही सांगितला गेला नाही. बैठकीदरम्यान मला राजीनामा देण्यास सांगण्यात आले. मला आश्चर्य वाटले, पण मला कोणताही लोभ नव्हता. सत्ता, म्हणून मी ताबडतोब राजीनामा दिला, पण माझ्या स्वाभिमानाला धक्का लागल्याने माझे मन भावूक झाले होते."
गेल्या तीन दिवसांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे मी भावूक होऊन अश्रू आवरण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्यांना फक्त खुर्चीचीच चिंता होती. ज्या पक्षासाठी आपण आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले त्या पक्षात माझे अस्तित्व नाही, अस्तित्वच नाही असे मला वाटले. दरम्यान, अशा अनेक अपमानास्पद घटना घडल्या ज्यांचा उल्लेख मी यावेळी करू इच्छित नाही. इतका अपमान आणि अवहेलना केल्यानंतर मला पर्यायी मार्ग शोधणे भाग पडले.जड अंत:करणाने मी विधिमंडळ पक्षाच्या त्याच बैठकीत म्हणालो - "आजपासून माझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होणार आहे." यात माझ्याकडे तीन पर्याय होते. पहिले म्हणजे राजकारणातून निवृत्ती, दुसरे म्हणजे स्वतःची संघटना उभी करणे आणि तिसरे म्हणजे या वाटेवर कोणी सोबती दिसला तर त्याच्यासोबत पुढचा प्रवास करायला हवा. त्या दिवसापासून आजपर्यंत आणि आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीपर्यंत या प्रवासात माझ्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
चंपाई सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चा पक्ष सोडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. झारखंडमध्ये एकूण ८१ जागांच्या विधानसभेत सध्या आठ जागा रिक्त आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) २६ ,काँग्रेस १६ आणि राष्ट्रीय जनता दल एक, सीपीआय (एमएल) आमदार विनोद सिंह हे देखील सत्ताधारी आघाडीचा भाग आहेत. झारखंड विधानसभेत बहुमतासाठी ३७ जागांची आवश्यकता आहे. भाजपकडे २३ जागा आहेत, 'एजेएसयू'कडे ३, NCP १ आणि दोन अपक्ष NDA सोबत आहेत. त्यामुळे सध्या तरी हेमंत सोरेन सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, चंपाई सोरेन हे झारखंडमधील भाजपच्या निवडणुकीच्या तयारीवर देखरेख करणाऱ्या हिमंता बिस्वा सरमा आणि शिवराज सिंह चौहान यांच्या संपर्कात असल्याचा दावाही केला जात आहे. मात्र, भाजपच्या एकाही नेत्याने या परिस्थितीवर उघडपणे भाष्य केलेले नाही.