नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचार्यांना दिवाळीच्या तोंडावर बुधवारी मोठी भेट दिली. महागाई भत्ता आणि महागाई सवलत 3 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयामुळे मूळ वेतनाचा भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्के झाला आहे. दिवाळी सणाच्या आधीच या निर्णयाने कर्मचार्यांची दिवाळी झाली आहे. ही वाढ 1 जुलैपासून लागू होणार आहे. केंद्र सरकारने शेतकर्यांनाही एक खुशखबर दिली आहे. रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) मोठी वाढ केली आहे. मोहरीच्या एमएसपीमध्ये क्विंटलमागे 300 रुपये, तर गहू पिकासाठी क्विंटलमागे 150 रुपयांची घसघशीत वाढ केली आहे. गहू आणि मोहरीसह जव, हरभरा, मसूर आणि करडई या रब्बी हंगामातील सहा पिकांची किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे.
निवृत्त कर्मचार्यांनाही मिळणार महागाई भत्तावाढीचा लाभ
गव्हाला किमान आधारभूत किमतीत क्विंटलमागे 150 रुपयांनी वाढ; मोहरीला 300 रुपये वाढ
काशी आणि पंडित दीनदयाळनगरला जोडण्यासाठी गंगा नदीवर आणखी एक पूल बांधण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. नवीन पूल रेल्वे आणि रस्ता दोन्हीसाठी असेल. पुलासाठी 2 हजार 642 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. दोन्ही ठिकाणांना जोडणार्या मालवीय पुलाचे आयुर्मान संपलेले आहे.
गव्हात खर्चाच्या तुलनेत 105 टक्क्यांनी एमएसपी
2025-26 या वर्षासाठी गव्हाच्या लागवडीचा खर्च अंदाजे 1,126 रुपये प्रतिक्विंटल आहे.
सरकारने गव्हाच्या खरेदीसाठी 2,425 रुपये प्रतिक्विंटल असा एमएसपी निश्चित .
याप्रकारे शेतकर्यांना खर्चाच्या तुलनेत जास्त एमएसपी दिला आहे. एमएसपीतील ही वाढ 105 टक्के आहे.
गतवर्षाच्या एमएसपीशी तुलना करता यंदा क्विंटलमागे 150 रुपयांची ही वाढ आहे.