

नवी दिल्ली : आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी एनडीएच्या वरिष्ठ स्तरावर या संदर्भात हालचालींना वेग आला असून मंत्रिपरिषदेत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. सत्ताधारी एनडीएच्या काही खासदारांना दिल्लीत येऊन राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. दरम्यान, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळात काही मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात तर काही विद्यमान मंत्र्यांना संघटनेत जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच पक्ष संघटनेतही बदल अपेक्षित असून भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नव्या टीमची घोषणा लवकरच होऊ शकते.
भाजपमध्ये संघटनात्मक बदलांसोबतच सरकारमध्येही समतोल साधण्याची रणनीती आखली जात आहे. विशेषतः उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब या राज्यांतील प्रतिनिधित्व वाढवण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. पक्षांतर्गत सूत्रांच्या मते, “एक व्यक्ती, एक पद” या तत्त्वाची अंमलबजावणी करत काही मंत्र्यांना त्यांच्या सध्याच्या पदांवरून मुक्त करून संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. तर दुसरीकडे काही नव्या खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.