सात राज्यांतील १३ जागांवर झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. इंडिया आघाडीने १३ पैकी १० जागा जिंकत भाजपला चांगलाच झटका दिला आहे. या पोटनिवडणुकीत भाजपला पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये जोरदार झटका बसला. यामध्ये काँग्रेस आणि तृणमूलने प्रत्येकी ४ जागा मिळवल्या आहेत. भाजपला २ तर आम आदमी पक्ष, द्रमुक आणि अपक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची जादू कायम आहे. तर हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी आपली पकड कायम ठेवली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनीही 'आप'ची घोडदौड कायम ठेवण्यात यश मिळवले.
या पोटनिवडणुकीत सर्वात धक्कादायक निकाल बिहारमधील आहे. अपक्ष उमेदवाराने सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला.बिहारमधील रुपौलीची लक्षवेधी झालेली लढत अपक्ष उमेदवार शंकर सिंह यांनी जिंकली आहे. त्यांनी जदयुच्या कलाधार मंडल यांचा ८ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. स्थानिक माजी आमदार असलेल्या राजदच्या विमा भारती तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. विमा भारती या रुपौलीच्या पहिल्या जदयुच्या आमदार होत्या मात्र नंतर त्या राजदमध्ये सामील झाल्या, त्यानंतर ही जागा रिक्त झाली. विमा भारती यांनी पुर्णियामधून राजदच्या वतीने लोकसभा निवडणूकही लढवली होती मात्र तिथेही त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.
हिमाचल प्रदेशच्या देहरा विधानसभेच्या जागेवर मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर यांनी भाजपचे उमेदवार आणि दोन वेळचे माजी आमदार होशियार सिंह चंबियाल यांचा ९,३९३ मतांनी पराभव केला. तर नालागडमध्येही काँग्रेसने विजय मिळवला. हमीरपूरमधील भाजपचे उमेदवार आशिष शर्मा यांनी काँग्रेसचे उमेदवार पुष्पेंद्र वर्मा यांचा १४३३ मतांनी पराभव केला. नालागडमध्ये काँग्रेसचे उमेदवार हरदीप सिंह बावा यांनी भाजपचे उमेदवार के. एल. ठाकूर यांच्यावर विजय मिळवला.
उत्तराखंडमधील दोन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपचा पराभव केला आहे. मंगळूर आणि बद्रीनाथ या दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. या पोटनिवडणुकीत भाजपला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा आणि हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दमदार कामगिरी करत विधानसभेच्या चारही जागा जिंकल्या आहेत.